घोटाळ्याचा उगम
सन 2022 ते 2024 या काळात जिल्ह्यात अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. शासनाने पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नैसर्गिक आपत्ती अनुदान जाहीर केले. मात्र, या अनुदानाचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांना न देता, संगणक प्रणालीचा गैरवापर करून बोगस नावे दाखल करणे, खोटी कागदपत्रे सादर करणे आणि बनावट एन्ट्रीज करणे अशा प्रकारे सुमारे 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांची बेकायदेशीर वळवणूक करण्यात आली.
advertisement
कारवाईची सुरुवात
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घोटाळ्याची गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अंबड येथील सहायक महसूल अधिकारी विलास मल्हारी कोमटवार यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 453 /2025 नुसार गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अमोल गुरले करत आहेत.
आरोपींची यादी
या प्रकरणी 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात २२ तलाठ्यांचा समावेश आहे. तलाठ्यांव्यतिरिक्त इतर शासकीय कर्मचाऱ्यांवरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यात:
सहायक महसूल अधिकारी : सुशील दिनकर जाधव
महसूल सहाय्यक : आशिषकुमार प्रमोदकुमार पैठणकर, निलेश सुखानंद इंचेकर (मृत), दिनेश बेराड
नेटवर्क इंजिनिअर : वैभव विशंभरराव आडगांवकर
संगणक परिचालक (तत्कालीन) : विजय निवृत्ती भांडवले
महसूल सेवक : रामेश्वर गणेश बारहाते
तलाठ्यांमध्ये गणेश रुबिंदर मिसाळ, कैलास शिवाजीराव घारे, विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर, बाळू लिंबाजी सानप, पवनसिंग हिरालाल सुलाने, शिवाजी श्रीधर ढालके, कल्याणसिंग अमरसिंग बमनावत, सुनील रामकृष्ण सोरमारे, मोहित दत्तात्रय गोषिक, चंद्रकांत तुकाराम खिल्लारे यांच्यासह इतरांची नावे आहेत.
चौकशी व शेतकऱ्यांचा संताप
या प्रकरणात अंबड आणि घनसांवगी तालुक्याचे तत्कालीन तहसीलदारांवर विभागीय चौकशी सुरू आहे. मात्र, त्यांच्यावर अद्याप गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांसाठी असलेले 25 कोटी रुपयांचे अनुदान लुटले गेले, हा प्रकार केवळ गंभीरच नाही तर शासनावरील विश्वास डळमळीत करणारा आहे.
