ई-पीक पाहणी म्हणजे काय?
पूर्वी सात-बारावर पिकांची नोंद हस्तलिखित स्वरूपात केली जात होती. मात्र आता महसूल विभागाने विकसित केलेल्या मोबाइल अॅपद्वारे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील पिकांची ऑनलाइन नोंदणी करावी लागते. ही प्रक्रिया जमाबंदी प्रणालीशी जोडलेली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची अधिकृत नोंद कायमस्वरूपी ऑनलाइन राहते.
ई-पीक पाहणी का आवश्यक आहे?
ई-पीक पाहणी केल्याशिवाय शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार नाही. यात प्रमुख लाभ पुढीलप्रमाणे आहेत जसे की, पीक विमा योजनेत भरपाई मिळणे, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासन मदत करते. तसेच आता नाफेड सीसीआयकडून शेतमालाच्या विक्रीपासून ते नुकसानभरपाईपर्यंत सर्व प्रक्रियेत ई-पीक पाहणी अनिवार्य आहे.
advertisement
खरेदीची प्रक्रिया
1 सप्टेंबरपासून कापूस खरेदीसाठी सीसीआयने कपास किसान हे मोबाइल अॅप सुरू केले आहे. त्याचप्रमाणे नाफेडद्वारे निवडलेल्या खरेदी केंद्रांवर तूर, सोयाबीन, मूग, उडीद व हरभरा या पिकांची खरेदी केली जाणार आहे. भरडधान्य खरेदी योजनेत ज्वारीचा समावेश आहे. या सर्व खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करताना सात-बारावर ई-पीक पेरा दाखवणे आवश्यक असेल.
नोंदणीवेळी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. खरेदी झाल्यानंतर शेतमालाचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केला जातो.
सर्व्हर समस्येवर मात
गत काही दिवसांपासून ई-पीक पाहणी करताना सर्व्हर डाऊनची समस्या शेतकऱ्यांना भेडसावत होती. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेत अडथळे येत होते. मात्र महसूल प्रशासनाने तांत्रिक दोष दूर केल्याने आता शेतकऱ्यांना नोंदणी सुरळीतपणे करता येत आहे.
शेतकऱ्यांसाठी सूचना
शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत घेण्यासाठी आणि हमीभावाने पिकांची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-पीक पाहणी करून ऑनलाइन पेरा नोंदवणे अत्यावश्यक आहे. यामुळे केवळ हमीभावच नव्हे, तर पीक विमा व आपत्ती मदतीचा लाभही वेळेत मिळणार आहे.
त्यामुळे शेतमालास हमीभाव तेव्हाच मिळणार जेव्हा ई-पीक पाहणी पूर्ण होईल हे वास्तव लक्षात घेऊन प्रत्येक शेतकऱ्याने ही प्रक्रिया तत्काळ पूर्ण करणे महत्त्वाचे ठरत आहे.