कंपोस्ट खत म्हणजे काय?
कंपोस्ट खत म्हणजे घरातील व शेतातील सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारे नैसर्गिक खत. भाजीपाल्याच्या साली, उरलेले अन्न, सुकी पाने, गवत, शेण, काडीकचरा अशा सेंद्रिय घटकांचे विघटन होऊन तयार झालेले खत जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त असते. या खतामुळे जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि माती भुसभुशीत राहते.
कमी जागेत कंपोस्ट कसे तयार कराल?
advertisement
घराच्या गॅलरीत, अंगणात किंवा शेताच्या कोपऱ्यात फक्त एक ड्रम, टाकी किंवा कुंडी असली तरी कंपोस्ट तयार करता येते. यासाठी फार मोठ्या जागेची गरज नसते. ५० ते १०० लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम घ्या. ड्रमच्या खालच्या बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी लहान छिद्रे पाडा.
कंपोस्ट तयार करण्याची सोपी पद्धत
सर्वप्रथम ड्रमच्या तळाशी थोडी माती किंवा सुकी पाने टाका. त्यावर घरातील ओला कचरा – भाजीपाला, फळांच्या साली, चहा पावडर टाका. त्यावर पुन्हा सुकी पाने, भुसा किंवा काडीकचरा टाकावा. ओला आणि सुका कचरा आलटून-पालटून थरांमध्ये टाकणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक थरावर थोडी माती किंवा शेणखत टाकल्यास विघटन लवकर होते.
खर्च अगदी नगण्य
ही प्रक्रिया करण्यासाठी वेगळे रसायन किंवा महाग साहित्य लागत नाही. घरातील कचऱ्याचाच वापर होत असल्याने खर्च जवळपास शून्य आहे. हवे असल्यास बाजारात मिळणारे कंपोस्ट कल्चर किंवा गांडूळ वापरून खत तयार करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करता येते.
किती दिवसांत खत तयार होते?
साधारण ३० ते ४५ दिवसांत उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत तयार होते. दर आठवड्याला कचरा हलवून ढवळल्यास हवा खेळती राहते आणि दुर्गंधी येत नाही. खत तयार झाल्यावर त्याचा रंग गडद तपकिरी आणि मातीसारखा सुगंध येतो.
शेतकरी आणि बागायतदारांना फायदे
कंपोस्ट खतामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो आणि पिकांची गुणवत्ता सुधारते. घरगुती बाग, भाजीपाला, फळझाडे तसेच शेतीसाठी हे खत अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
