उपवासामुळे रताळीला वाढती मागणी
रताळी हे उपवासाच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे पीक आहे. पौष्टिक मूल्य, चव आणि सहज उपलब्धतेमुळे महाशिवरात्रीसारख्या सणाला रताळीला विशेष मागणी असते. हीच बाब लक्षात घेऊन शेतकरी जुलै महिन्यात लागवड करून फेब्रुवारीत काढणी करतात.
कमी खर्च, कमी कालावधीतील फायदेशीर पीक
रताळी पीक कमी खर्चात येते आणि साधारण तीन ते पाच महिन्यांत काढणीस येते. हलक्या जमिनीतही समाधानकारक उत्पादन मिळत असल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांचा या पिकाकडे ओढा वाढला आहे. कमी जोखीम आणि हमखास बाजारभाव यामुळे रताळी शेती फायदेशीर ठरत आहे.
advertisement
एकरी २५० क्विंटल उत्पादन, शेतकरी समाधानी
लोणगाव परिसरात सध्या ट्रॅक्टर आणि बैलजोडीच्या साह्याने रताळी काढणी सुरू आहे. यंदा एका एकरातून सरासरी २५० क्विंटल उत्पादन मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. चांगला पाऊस आणि योग्य मशागतीचा थेट परिणाम उत्पादनावर झाल्याचे शेतकरी सांगतात.
प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांचा भाव अपेक्षित
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बाजारात मागणी वाढल्याने प्रतिक्विंटल किमान दोन हजार रुपये भाव मिळावा, अशी अपेक्षा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन ठोक भावाने खरेदी करत असल्याने वाहतूक आणि बाजारखर्च वाचत आहे.
परिसरातील गावांतही रताळी शेती वाढतेय
पूर्वी रताळी लागवड प्रामुख्याने लोणगावपुरती मर्यादित होती. मात्र, कमी खर्चात अधिक उत्पादन आणि चांगले उत्पन्न मिळत असल्याने आता उंबरखेड, डोणगाव, राजूर, तपोवन आदी गावांतील शेतकरीही या पिकाकडे वळू लागले आहेत. भविष्यात रताळी शेतीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इतर जिल्ह्यांतील व्यापारी थेट बांधावर
महाशिवरात्री जवळ आल्याने जालना, अहिल्यानगर, केज, धारूर तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या शेतावर येऊन खरेदी करत आहेत. काही शेतकरी स्वतः बाजारपेठेत जाऊन किरकोळ विक्री करत अधिक दर मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
१० लाखांचा नफा अपेक्षित
“दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही पाच एकर क्षेत्रात रताळी लागवड केली आहे. सध्या काढणी अंतिम टप्प्यात असून, एकरी सुमारे २५० क्विंटल उत्पादन मिळत आहे. महाशिवरात्रीमुळे मागणी वाढली असून, यंदा किमान दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे,” असे शेतकरी ओंकारसिंह शेखावत यांनी सांगितले.
