बहुविभागीय समितीला जबाबदारी
या टास्क फोर्सचे नेतृत्व विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी करणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन सुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यनित शितोळे आणि सोनाली शिळकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत विविध विभागांचा समन्वय साधून काम केले जाणार आहे.
advertisement
मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा समावेश
या कृती दलात केवळ शासकीय अधिकारीच नाहीत, तर शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रत्यक्ष काम करणारे तज्ज्ञही सहभागी करण्यात आले आहेत. ‘शिवार फाऊंडेशन’च्या माध्यमातून संशोधन करणारे कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा आणि महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर अभ्यास करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुष्टी डोईजड यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या टास्क फोर्सच्या कामकाजाला मानवी संवेदना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मिळणार आहे.
नव्या यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा
या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या मानसिक तणावासह आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांवर प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. या नव्या यंत्रणेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हवामान बदल आणि आर्थिक ताण मोठे कारण
राज्यात विविध शेतकरी कल्याणकारी योजना राबवण्यात येत असल्या तरी हवामान बदलामुळे वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा भार आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकरी अजूनही संकटात सापडत आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत असल्याचे विभागाने नमूद केले आहे.
आपत्तीपूर्व ते आपत्तीनंतर मदतीचा आराखडा
या टास्क फोर्सच्या माध्यमातून आपत्तीपूर्व, आपत्तीच्या काळात आणि आपत्तीनंतर शेतकऱ्यांना शेतीविषयक, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अशा चतुःसूत्री दृष्टिकोनातून मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी एकात्मिक पद्धतीने हाताळून दीर्घकालीन व शाश्वत उपाययोजना उभारण्याचा सरकारचा मानस आहे.
केवळ भरपाई नव्हे, तर प्रतिबंधावर भर
कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी स्पष्ट केले की, शेतकरी आत्महत्या हा प्रश्न केवळ आत्महत्येनंतर आर्थिक मदत देण्यापुरता मर्यादित नाही. शेतकऱ्यांना आधीच सक्षम करणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे, जोखीम कमी करणे आणि मानसिक आधार देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी कृषी विभागातील विविध योजना इतर विभागांशी समन्वय साधून अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहेत.
