पारंपरिक पिकांना फाटा, बाजाराभिमुख शेतीकडे वाटचाल
काही वर्षांपूर्वीपर्यंत निरवाडी बु. येथे कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी हीच पिके प्रामुख्याने घेतली जात होती. मात्र वाढता उत्पादन खर्च, अनिश्चित पावसाळा आणि अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडत होते. पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत आणि बाजारपेठेतील मागणी यांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी हळदीकडे वळण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयातून गावाच्या आर्थिक परिवर्तनाची सुरुवात झाली. आज गावाच्या एकूण ३७९ हेक्टर लागवड क्षेत्रापैकी सुमारे १२५ हेक्टरवर हळदीची लागवड केली जाते.
advertisement
एकरी दोन लाखांपर्यंत निव्वळ नफा
हळद पिकासाठी एकरी सरासरी खर्च सुमारे एक लाख रुपये येतो. यामध्ये बियाणे, लागवड व मशागत, ठिबक सिंचन, काढणी व प्रक्रिया यांचा समावेश आहे. सरासरी उत्पादन २५ क्विंटल (वाळलेली हळद) मिळते, ज्याचे बाजारमूल्य सुमारे तीन लाख रुपये आहे. त्यामुळे एकरी जवळपास दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा शेतकऱ्यांच्या हाती येतो. योग्य व्यवस्थापन केल्यास काही शेतकरी ३० क्विंटलपर्यंत उत्पादन घेत असल्याचेही दिसून येते.
ठिबक सिंचनामुळे शक्य झाली क्रांती
कृषी विभागामार्फत ८० टक्के अनुदानावर ठिबक सिंचन उपलब्ध झाल्याने कमी पाण्यातही हळदीची यशस्वी लागवड शक्य झाली. सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची बचत, अचूक खत व्यवस्थापन आणि उत्पादनात वाढ असे तिहेरी फायदे मिळाले. सहायक कृषी अधिकारी सुहास थोपटे आणि मंडळ कृषी अधिकारी बलभीम आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीजप्रक्रिया व बायोमिक्सच्या वापरामुळे कंदकुज रोगावर कमी खर्चात नियंत्रण मिळवता आले.
शेतकऱ्यांचे अनुभव
“माझ्याकडे २२ एकर शेती असून त्यापैकी ११ एकरवर हळदीची लागवड केली आहे. ठिबक सिंचनामुळे पाण्याची मोठी बचत होते. एकरी सरासरी ३० क्विंटल उत्पादन मिळत असून नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे,” असे शेतकरी सदाशिव खांडेकर सांगतात.
तर “दरवर्षी चार ते पाच एकरांवर हळद घेतो. एकरी सुमारे २५ क्विंटल उत्पादन मिळते. पाच एकरांतून दहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते, जे इतर पिकांतून शक्य नव्हते,” असे मत शेतकरी बाबासाहेब काळे व्यक्त करतात.
बदललेले गावाचे अर्थचक्र
आज गावातील प्रत्येक कुटुंबाकडे एक ते पंधरा एकरांपर्यंत हळदीची लागवड आहे. एकरी सरासरी दोन लाख रुपयांचा नफा, शेतीतून स्थिर नगदी प्रवाह आणि गावाचे पाच कोटींहून अधिक वार्षिक उत्पन्न या सगळ्यांनी निरवाडी बु. चे अर्थकारण मजबूत केले आहे. योग्य पाणी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान, सरकारी अनुदान आणि बाजारपेठेचा अचूक अभ्यास या चार घटकांच्या बळावर या गावाने हळदीच्या माध्यमातून विकासाचा सुवर्णकाळ अनुभवला आहे.
