गेल्या तीन वर्षांपासून वांग्याची यशस्वी लागवड
राजेंद्र सोनवणे हे गेल्या तीन वर्षांपासून वांग्याचे पीक घेत असून यंदाचा हंगाम त्यांच्यासाठी सर्वाधिक लाभदायक ठरला आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत त्यांनी आतापर्यंत १६ वेळा वांग्याची तोड घेतली आहे. या कालावधीत सुमारे ३० टन वांग्यांची विक्री झाली असून अजूनही झाडांवर भरघोस फळधारणा सुरू आहे. मार्च महिन्यापर्यंत वांग्याची तोड सुरू राहणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
दर्जेदार बियाण्यांची योग्य निवड
उत्पादन वाढीमागे बियाण्यांची योग्य निवड हा महत्त्वाचा घटक ठरला. सोनवणे यांनी इंझा कंपनीचे ‘बारटोक’ जातीचे काळे भरिती वांगे लागवडीसाठी वापरले. एक हजार बियाणे असलेली एक मुडी साडेचार हजार रुपयांना खरेदी करण्यात आली. एकूण तीन हजार बियाणांसाठी सुमारे १५ हजार रुपयांचा खर्च झाला. नर्सरीमध्ये रोपे तयार करण्यासाठी प्रत्येक रोपामागे सुमारे १ रुपया २० पैसे खर्च आला.
शास्त्रोक्त पद्धतीने लागवड आणि मशागत
लागवडीपूर्वी बेड तयार करताना निंबोळी पेंड, वसाडोस आणि कोंबडी खताच्या सुमारे ५० बॅग्स वापरण्यात आल्या. ऑगस्ट महिन्यात मलचिंग पेपर टाकून पाच बाय तीन फूट अंतरावर रोपांची लागवड करण्यात आली. मलचिंगमुळे तण नियंत्रण, जमिनीत ओलावा टिकून राहणे आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली. लागवडीनंतर अवघ्या दोन महिन्यांत म्हणजे ऑक्टोबरमध्ये पहिली तोड सुरू झाली.
औषध फवारणी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पीक संरक्षणासाठी औषध फवारणीचे काटेकोर नियोजन करण्यात आले. इकोला अॅग्रो कंपनीचे अर्जुन शिंदे यांनी औषध फवारणीबाबत मार्गदर्शन केले. तसेच बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शेतावर भेट देऊन पिकाची पाहणी केली. आतापर्यंत औषध फवारणीसाठी सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा खर्च झाला आहे.
कुटुंबाची साथ, मजुरांची मदत
शेतीची रोजची देखभाल राजेंद्र सोनवणे हे पत्नी पूनम आणि आई-वडिलांच्या मदतीने करतात. पाणी व्यवस्थापन, खतांचा वापर आणि पिकाचे निरीक्षण कुटुंब एकत्रितपणे करत असल्याने काम सुलभ होते. मात्र वांग्याची तोड करताना मजुरांची मदत घ्यावी लागते.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
“बियाणे आणि औषध कंपन्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेती केल्यामुळेच हे यश मिळाले. कुटुंबाची साथ आणि नियोजन महत्त्वाचे ठरले,” असे समाधान व्यक्त करताना राजेंद्र सोनवणे सांगतात. कमी क्षेत्रात अधिक उत्पादन कसे घ्यावे, याचा आदर्श नमुना म्हणून त्यांची शेती परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
