देशात १७७ लाख टनांहून अधिक खतसाठा
खत मंत्रालयाच्या माहितीनुसार सध्या देशात एकूण १७७.३१ लाख टन खतांचा साठा उपलब्ध आहे. या साठ्यात विविध प्रकारच्या खतांचा समावेश असून युरिया, डीएपी आणि संयुक्त खतांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार देशात सुमारे ५९.३० लाख टन युरिया उपलब्ध आहे, तर डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताचा साठा सुमारे २५.१३ लाख टन आहे. याशिवाय सुमारे ५५.८७ लाख टन संयुक्त खतांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.
advertisement
मागील वर्षी याच कालावधीत देशात सुमारे १२९.८५ लाख टन खतसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेत यंदा खतांचा साठा जवळपास ३६ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे खरीप हंगामात खतपुरवठा सुरळीत राहील, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. मात्र या आकडेवारीत म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) या खताच्या साठ्याचा स्वतंत्र उल्लेख करण्यात आलेला नाही.
खत आयातीवरही भर
खरीप हंगामात खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने केंद्र सरकारने आयातीवरही विशेष भर दिला आहे. खतांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर तयार खतांची आयात करण्यात येत आहे. फेब्रुवारी २०२६ पर्यंत देशात सुमारे ९८ लाख टन तयार खतांची आयात करण्यात आली आहे.
याशिवाय पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत आणखी १७ लाख टनांपेक्षा जास्त खत आयात करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे आगामी काळातही खतसाठा स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एप्रिलमध्ये होणार खरीप मागणीचा आढावा
दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या खतांच्या मागणीचा अंतिम अंदाज एप्रिल महिन्यात होणाऱ्या वार्षिक खरीप परिषदेत निश्चित केला जाणार आहे. या परिषदेत देशातील विविध राज्यांच्या कृषिमंत्र्यांची बैठक होणार असून त्या वेळी प्रत्येक राज्याची खतांची गरज ठरवली जाईल. त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल.
जागतिक घडामोडींमुळे अनिश्चितता
दरम्यान, इराण, इस्त्राईल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाली आहे. या संघर्षाचा परिणाम जागतिक खत व्यापारावर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः होर्मूझ सामुद्रधुनी मार्गे होणारी वाहतूक अडथळ्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जागतिक खत व्यापारातील सुमारे ३३ टक्के व्यापार हा या मार्गातून होतो. त्यामुळे या मार्गावर अडथळे निर्माण झाल्यास अनेक देशांच्या खत आयातीवर परिणाम होऊ शकतो. भारतही मोठ्या प्रमाणात खत आयात करत असल्याने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
गतवर्षीची खतविक्री
मागील वर्षी खरीप हंगामात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत देशात मोठ्या प्रमाणावर खतांची विक्री झाली होती. त्या कालावधीत सुमारे १९३ लाख टन युरिया, ४६.३३ लाख टन डीएपी, १०.९५ लाख टन एमओपी आणि ८१.४८ लाख टन संयुक्त खतांची विक्री झाली होती.
त्याच काळात युरियाची मागणी सुमारे १८५ लाख टन, डीएपीची ५६.९९ लाख टन, एमओपीची ११.१३ लाख टन आणि संयुक्त खतांची मागणी ७६.५१ लाख टन इतकी नोंदवली गेली होती. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठीही खतसाठ्याचे नियोजन आधीपासूनच करण्यात येत असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
