पारंपरिक शेतीतून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा निर्णय
विनोद तोडकर हे गेली २० वर्षे पारंपरिक पद्धतीने हळदीची शेती करत होते. मात्र, हवामान बदल, मुळांवर होणारे बुरशीजन्य रोग आणि रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेती तोट्यात जाऊ लागली. एनपीकेसारख्या खतांचा खर्च वाढत असल्याने उत्पादन खर्च नियंत्रणाबाहेर गेला. या संकटातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीचा पर्याय स्वीकारला. यात जनावरांचे शेणखत, कंपोस्ट आणि नैसर्गिक कीड नियंत्रणावर भर दिला जातो.
advertisement
सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनात दुप्पट वाढ
सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यानंतर विनोद यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. पूर्वी प्रति एकर २०-२५ क्विंटल हळद मिळत असताना आता ते ४० ते ४५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेत आहेत. काही हंगामात हे उत्पादन ५२ क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. उत्पादन वाढल्यामुळे त्यांचे उत्पन्नही लक्षणीय वाढले आहे.
विक्रमी उत्पन्न आणि लाखोंची उलाढाल
गेल्या हंगामात विनोद यांनी १.५ एकर जमिनीतून सुमारे ३ टन सेंद्रिय हळद पावडर तयार केली. ही हळद त्यांनी ७५० रुपये प्रति किलो दराने विकली. यामुळे त्यांची एकूण उलाढाल २१ लाख रुपयांपर्यंत पोहोचली. सर्व खर्च वजा केल्यानंतर त्यांना सुमारे १० लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला.
आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय उपायांचा वापर
विनोद शेतीसाठी कोंबडी खत, बायो-अमृत आणि गांडूळ खताचा वापर करतात. सरी-बारी पद्धतीने लागवड केल्यामुळे पाणी व्यवस्थापन सुधारते आणि कंद सडण्याची शक्यता कमी होते. तसेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी आणि खत थेट मुळांपर्यंत पोहोचवले जाते.
आंतरपीकातून अतिरिक्त उत्पन्न
हळद हे दीर्घकालीन पीक असल्यामुळे विनोद त्यासोबत कोथिंबीरचे आंतरपीक घेतात. त्यामुळे मुख्य पीक तयार होण्यापूर्वीच त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. यामुळे आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
विनोद तोडकर यांचा हा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून केवळ स्वतःचे उत्पन्न वाढवले नाही, तर टिकाऊ शेतीचा मार्गही दाखवून दिला आहे
