जालना : मागील काही वर्षात सोयाबीन ही शेतकऱ्यांसाठी प्रमुख नगदी पीक म्हणून पुढे आले आहे मात्र मागील दोन वर्षांपासून सोयाबीनला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकरी हवालदिल आहेत. निवडणुका आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला 6 हजार हमीभाव देण्याची घोषणा केली होती. मात्र निवडणुकी निकालानंतर शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा देखील फोल ठरली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली असून आवकेत घट होऊन देखील दरात सुधारणा झालेली नाही. पाहुयात जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची किती आवक आहे आणि सोयाबीनला काय दर मिळत आहे.
advertisement
महिनाभरापूर्वी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची 25 हजार क्विंटल पर्यंत आवक येत होती मात्र आता आवक मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे. सध्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत 6 ते 7 हजार क्विंटल सोयाबीनची दररोज आवक होत आहे. या सोयाबीनला 3,700 ते 4,150 रुपये असा दर मिळत आहे. निवडणूक झाल्यानंतर सोयाबीन दरात सुधारणा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र निवडणुकीआधी 4,300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कमाल असलेले सोयाबीनचे भाव आता 4,150 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली असल्याचे व्यापारी अशोक पाचफुले यांनी सांगितलं.
आधी 20 ते 25 हजार पोते एवढी दररोजची आवक होती आता ती केवळ 6 ते 7 हजार पोते एवढी आहे. सोयाबीनचे दर ही स्थिर आहेत. दरामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. जालन्यातील प्लांटने सोयाबीनसाठी 4,150 रुपये एवढा भाव 10 ते 11 मोईश्चर असलेल्या सोयाबीनसाठी ठरवला आहे आणि डागी असलेल्या सोयाबीनला 3,700 पासून पुढे भाव मिळत आहे. तर बियाण्यासाठी असलेल्या ग्रीन गोल्ड व्हरायटीला 4,400 पर्यंत दर मिळत आहे. नवीन सरकारकडून शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली आहे तर 50 टक्के शेतकरी भाव वाढतील या अपेक्षेवर थांबले आहेत. शेतकऱ्यांना किमान 5,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सोयाबीनचे भाव जातील, अशी अपेक्षा असल्याचं व्यापारी अशोक पाचपुते यांनी सांगितलं.