पुण्याचा गणेशची कमाल, काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास केला 16 दिवसांत पूर्ण, रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली असून, गणेश गायकवाड यांना IBR Achiever हा मान मिळाला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गणेश गायकवाड यांनी सायकलिंगच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत अवघ्या 16 दिवसांत काश्मीर ते कन्याकुमारी (K2K) असा तब्बल 3932.84 किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली असून, गणेश गायकवाड यांना IBR Achiever हा मान मिळाला आहे.
गणेश गायकवाड यांचा सायकलिंगचा प्रवास 2022 साली सुरू झाला. गेल्या चार वर्षांत त्यांनी भारतभर सुमारे 40 हजार किलोमीटरहून अधिक अंतर सायकलवरून पार केले आहे. नोकरी सांभाळत कामाच्या आधी किंवा कामावरून आल्यानंतर वेळ काढून ते नियमित रनिंग आणि सायकलिंगचा सराव करत असतात. पंढरपूर वारी, अष्टविनायक यात्रा तसेच अनेक लांब पल्ल्याचे प्रवास पूर्ण केल्यानंतर काश्मीर ते कन्याकुमारी हा अत्यंत आव्हानात्मक प्रवास करण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली आणि योगायोगाने ती पूर्णत्वास गेली.
advertisement
ही मोहीम मावळ तालुक्यातील सूरज जाट आणि गणेश गायकवाड या दोन तरुण सायकलपटूंनी मिळून पूर्ण केली. अवघ्या 16 दिवसांत सुमारे 4000 किमी अंतर पार करत त्यांनी कश्मीर ते कन्याकुमारी हा आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि कठीण सायकल राइडपैकी एक प्रवास यशस्वी केला. या प्रवासाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2026 मध्ये करण्यात आली आहे.
advertisement
विशेष म्हणजे, हा भव्य उपक्रम भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. देशाच्या एकात्मतेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार पटेल यांच्या कार्याला अभिवादन म्हणून Ride for Unity या संकल्पनेअंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेचे आयोजन भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या Fit India Movement आणि Dare Gear Adventures यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. देशभरातून आलेल्या हजारो अर्जांमधून निवड प्रक्रियेनंतर केवळ 150 सायकलस्वारांची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रातून निवड झालेल्या रायडर्समध्ये गणेश गायकवाड आणि सूरज जाट यांचा समावेश होता.
advertisement
या प्रवासादरम्यान रायडर्सनी श्रीनगर ते कन्याकुमारी असा प्रवास करत जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू अशा अनेक राज्यांतून मार्गक्रमण केले. काश्मीरमधील कडाक्याच्या थंडीपासून दक्षिण भारतातील उष्ण हवामान, उंचसखल रस्ते, हवामानातील सातत्याने होणारे बदल आणि दररोज 250 ते 300 किलोमीटरचे अंतर अशी कठोर आव्हाने त्यांनी पेलली. या मोहिमेचा समारोप 17 नोव्हेंबर रोजी कन्याकुमारी येथे झाला.
advertisement
आपल्या यशाबद्दल बोलताना गणेश गायकवाड म्हणाले, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये माझ्या कामगिरीची अधिकृत नोंद होणे हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. ही कामगिरी सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि जिद्दीमुळेच शक्य झाली. या संपूर्ण प्रवासात कुटुंबीय, मित्र, गुरुजन आणि सायकल कम्युनिटीचा मोठा पाठिंबा लाभला. मेहनत आणि आवड जपली तर यश नक्कीच मिळते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 5:34 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याचा गणेशची कमाल, काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास केला 16 दिवसांत पूर्ण, रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद






