काळे ढग भारतासाठीही धोकादायक?
संजय राऊत यांनी सभागृहात सांगितले की, इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील संघर्षाला आता महिन्याहून अधिक काळ झाला असून त्याचे परिणाम हळूहळू इतर देशांपर्यंत पोहोचत आहेत. त्यांनी इशारा दिला की, इराणमधील हवाई हल्ले आणि स्फोटांमुळे निर्माण झालेले प्रदूषण भारतासाठीही धोका ठरू शकते. “आपल्यावर बॉम्ब पडत नसले तरी इराणवर घोंघावणारे ‘काळे ढग’ तितकेच धोकादायक ठरू शकतात,” असे त्यांनी नमूद केले.
advertisement
तेहरान आणि आसपासच्या भागात झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि गॅस साठवणूक केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे त्यांनी सांगितले. या आगीमुळे वातावरणात विषारी धूर पसरला असून, त्यात सल्फर, नायट्रोजन ऑक्साईडसारखी घातक रसायने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतातील राज्यांवर संभाव्य परिणाम
या प्रदूषणाचे परिणाम भविष्यात भारतातही दिसू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः गुजरात, राजस्थान आणि पंजाब या पश्चिमेकडील राज्यांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. या भागांतील शेती, पशुधन आणि मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पर्यावरण तज्ज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञांनीही या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. ‘किसान इंडिया’ या वृत्त संस्थेने घेतलेल्या संवादात तज्ज्ञांनी सांगितले की, अशा प्रकारचे प्रदूषण सीमारेषांमध्ये अडकून राहत नाही. वाऱ्याच्या दिशेनुसार ते इतर देशांमध्ये पोहोचू शकते.
आम्लवर्षा आणि आरोग्य धोक्यांची भीती
इराणमधील काही भागांमध्ये ‘काळा पाऊस’ पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हा पाऊस विषारी घटकांनी युक्त असल्याने तो अत्यंत धोकादायक मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही आम्लवर्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालावू शकते, जमिनीची सुपीकता कमी होऊ शकते आणि पिकांचे नुकसान होऊ शकते. याशिवाय, श्वसनाचे आजार, त्वचारोग आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
इंधन संकटाचीही शक्यता
या युद्धामुळे इंधन आणि एलपीजीसारख्या जीवनावश्यक वस्तूंवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत होत असल्याने दरवाढ आणि तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो, असेही राऊत यांनी सांगितले.
मध्य-पूर्वेतील संघर्षाचे परिणाम केवळ त्या प्रदेशापुरते मर्यादित नसून, पर्यावरण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशी गंभीर चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली.
