माघ संकष्टी चतुर्थीचे महत्त्व - संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येत असली तरी माघ महिन्यातील ही तिथी अत्यंत विशेष मानली जाते. या दिवशी गणपतीच्या 'द्विजप्रिय' स्वरूपाची आराधना केली जाते. 'द्विज' म्हणजे ज्ञानाच्या आणि शिस्तीच्या मार्गावर चालणाऱ्यांना प्रिय असणारे गणपतीचे रूप. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत अनेक कुटुंबांमध्ये ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. कुणी परीक्षेतील यशासाठी तर कुणी कर्जमुक्तीसाठी बाप्पाला साकडे घालत असते. शास्त्रांनुसार, द्विजप्रिय गणेश हे चार हात असलेले आणि शुभ्र वर्णाचे रूप आहे. हे रूप शांतता, विवेक आणि मानसिक स्थिरतेचे प्रतीक मानले जाते. या स्वरूपाची उपासना केल्यामुळे मनाची चंचलता कमी होते आणि कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते, असे मानले जाते.
advertisement
संकष्टी चतुर्थीची पूजा विधी - या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. देव्हारा स्वच्छ करून गंगाजलाने शुद्ध करावा आणि गणपतीचे ध्यान करून व्रताचा संकल्प सोडावा. बाप्पाला धूप, दीप, फुले, फळे आणि मोदक अर्पण करावेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी षोडशोपचार पूजा करावी. दिवसभर स्वतःच्या वागण्यात संयम ठेवावा आणि मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नयेत. रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊनच उपवास सोडावा. चंद्राला अर्घ्य देताना मनावरचा दिवसभराचा ताण हलका झाल्याची अनुभूती अनेक भक्त व्यक्त करतात.
सोनं नाही, चांदी लाभते! फक्त 3 राशींच्या लोकांना सर्वाधिक फायदा मिळतो
तिथी आणि शुभ मुहूर्त -
चतुर्थी तिथी प्रारंभ: 5 फेब्रुवारी 2026, रात्री 12:09 वाजता
चतुर्थी तिथी समाप्ती: 6 फेब्रुवारी 2026, रात्री 12:22 वाजता
चंद्रोदयाची वेळ: रात्री 09:42 वाजता
व्रताचे महत्त्व - आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी केवळ एक धार्मिक विधी न राहता आत्मविश्वास आणि संयम मिळवण्याचे एक माध्यम बनली आहे. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा धैर्याने सामना करण्याची शक्ती या व्रतामुळे मिळते, म्हणूनच आजची तरुण पिढी देखील या परंपरेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे.
