अतुल्या शेखर ही केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्या वर्षभरापासून युएईमध्ये राहत होती. शनिवारी सकाळी ती मृतावस्थेत आढळून आली. त्या दिवशी ती नवीन नोकरीसाठी रुजू होणार होती, असे वृत्त मातृभूमी या वृत्तपत्राने दिले आहे. तिचा नवरा सतीश शंकर युएईमध्ये एका खासगी कंपनीत साईट इंजिनीयर म्हणून काम करत होता.
सतीशने The News Minute ला दिलेल्या माहितीमध्ये पत्नीला मारहाण केली हे तो नाकारत नाही, असे स्पष्ट केले. हो, मी तिला मारले. पण मी रोज तसं करत नव्हतो. मी दारूच्या नशेत होतो, असे त्याने कबूल केले.
advertisement
सतीशने आरोप केला की, अतुल्याही त्याला मारहाण करत असे. तिला राग आला की ती काय करत आहे हे तिला समजत नसे... तिने मला प्रेमामुळे मारले, असे तो म्हणाला.
दरम्यान, अतुल्याच्या कुटुंबीयांनी सतीशवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या घटनेनंतर सतीशला त्याच्या कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. अतुल्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे कंपनीने ही कारवाई केली.
कोल्लम येथे अतुल्याच्या मृत्यूप्रकरणी हुंडाबळी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की, सतीशशी लग्न करताना अतुल्याला दुचाकी आणि सोनं हुंड्याच्या स्वरूपात देण्यात आलं होतं.
अतुल्याच्या आईने असा गंभीर आरोप केला आहे की, सतीशने अतुल्याचा गळा दाबून हत्या केली. तिच्या पोटावर लाथा मारल्या आणि तिच्या डोक्यावर ताट मारल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना 18 ते 19 जुलै दरम्यान घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. सतीश आणि अतुल्याचं लग्न बारावी वर्षांपूर्वी झालं होतं आणि त्यांना एक मुलगी आहे.
या घटनेसारखीच आणखी एक धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. कोल्लमच्या व्हिपांचिका मणी (33) हिने 8 जुलै रोजी शारजाच्या अल नाहदा परिसरातील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आपल्या दीड वर्षाच्या मुलीचा – वैभवीचा – खून करून आत्महत्या केली. व्हिपांचिकाने हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप केला होता.
