एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेता अर्जुन रामपाल याने २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या रात्रीचा एक अंगावर काटा आणणारा अनुभव शेअर केला. यावेळी त्याने सांगितले की त्याच्यासाठी ही केवळ एक भूमिका नव्हती, तर त्याने घेतलेला तो सूड होता. नुकतंच मुंबईत पार पडलेल्या 'हॅलो! हॉल ऑफ फेम' पुरस्कार सोहळ्यात अर्जुन रामपालला गौरवण्यात आले. यावेळी अर्जुन भावूक झाला आणि त्याने २००८ सालच्या त्या भीषण हल्ल्याच्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे २६ नोव्हेंबरला अर्जुनचा वाढदिवस असतो.
advertisement
अर्जुन रामपालच्या वाढदिवशीच झाला २६/११ हल्ला
पुरस्कार मिळाल्यानंतर भाषण देताना अर्जुन म्हणाला, "२६ नोव्हेंबर २००८ ची ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही. मी माझ्या मित्रांना घेण्यासाठी वरळीच्या फोर सीझन्स हॉटेलमध्ये गेलो होतो. माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही तिथून ताज हॉटेलला जाणार होतो. आम्ही हॉटेलच्या बारमध्ये बसून ड्रिंकची ऑर्डर दिलीच होती की अचानक माहिमच्या बाजूने मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला आणि तिथल्या काचा थरथरल्या. त्या क्षणी आम्हाला कळलेच नाही की नक्की काय झाले?"
अर्जुनने पुढे सांगितले की, अवघ्या काही मिनिटांत फोन वाजायला सुरुवात झाली. सुरुवातीला कुलाबा परिसरात गँगवॉर सुरू झाल्याची अफवा होती. पण २०-३० मिनिटांतच हॉटेलला घेराव घातला गेला आणि कोणालाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. ज्या हॉटेलमध्ये अर्जुन सेलिब्रेशनसाठी जाणार होता, तिथेच दहशतवाद्यांनी निरपराध लोकांना कैद करून ठेवले होते.
हल्ल्याचा अर्जुन रामपालवर गंभीर परिणाम
आपल्या वाढदिवशी अर्जुनसोबत अशी भयानक घटना घडत होती, ज्यामुळे तो स्तब्ध झाला होता. ती रात्र दहशतीत घालवल्यानंतर सकाळी जेव्हा अर्जुन आपल्या कारने घराकडे निघाला. त्या रात्री त्याने जे दृश्य पाहिले ते भयानक होते. घरी जाताना त्याला किमान ३ वेळा कार थांबवावी लागली, कारण त्याला सतत मळमळत होते. मुंबईची ती अवस्था त्याला बघवत नव्हती.
चित्रपटातून अर्जुनने घेतला हल्ल्याचा सूड
जेव्हा दिग्दर्शक आदित्य धर यांनी अर्जुनला 'धुरंधर'ची कथा ऐकवली आणि २६/११ च्या मास्टरमाइंडची (मेजर इक्बाल) भूमिका ऑफर केली, तेव्हा अर्जुनला वाटले की हीच ती वेळ आहे. अर्जुन म्हणाला, "आदित्यने जेव्हा मला तो सीन ऐकवला, तेव्हा मला समजले की मला आता माझा सूड घ्यायचा आहे. मेजर इक्बालची भूमिका करून मी तो सूड घेतला. शेवटी मला इतकेच म्हणायचे आहे, 'भारत माता की जय'!"
अर्जुन रामपालने 'धुरंधर'मध्ये इलियास काश्मीरी या खऱ्या दहशतवाद्यावर आधारित 'मेजर इक्बाल' हे पात्र साकारले आहे. हा थंड डोक्याचा आणि अत्यंत क्रूर असा आयएसआय मास्टरमाइंड होता, ज्याचा अनेक भारतविरोधी कारवायांमध्ये सहभाग होता. रणवीर सिंग, आर. माधवन आणि अक्षय खन्ना यांसारख्या तगड्या कलाकारांमध्ये अर्जुनने आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप पाडली आहे.
