हनी इराणी यांनी विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "माझी आणि जावेदची पहिल्यांदा भेट 'सीता और गीता'च्या सेटवर झाली होती. चित्रपटाच्या शुटिंगपासूनच आम्ही एकमेकांना ओळखू लागलो. मला जावेदमधली विनोदबुद्धी फार आवडायची. पण असं असलं तरीही त्याच्याकडे फार ज्ञान होतं. त्याच्याकडे असलेल्या ज्ञान भंडारामुळे तो कोणासोबतही कोणत्याही मुद्द्यावर अगदी सहजतेने संवाद साधायचा. खरंतर तो मला त्या कारणामुळेच आवडू लागला."
advertisement
पहिल्या भेटीचा किस्सा सुद्धा हनी यांनी सांगितला. त्या म्हणाल्या की, "आमच्या दोघांचीही पहिली भेट चित्रपटाच्या सेटवरचीच. मला शुटिंग वेळी काय बोलायचंय? माझ्या लाईन्स काय असतील? तो याबद्दल मला सांगतल होता. ते सांगत असतानाही माझ्यासोबत तो विनोद करायचा. मला त्याच्या त्याच गोष्टी प्रभावित झाल्या. एकमेकांविषयी आम्हाला ओढ असल्यामुळे शुटिंगव्यतिरिक्तही भेटण्याचं ठरवलं. तो एकदा पत्ते खेळत होता, पण त्यात तो सतत हरतच होता. तर त्याने मला एकदा एक पत्ता काढायला सांगितला आणि तो त्याच्यासाठी फार लकी ठरला. त्या खेळामध्ये तो जिंकला."
"पत्ते खेळून झाल्यानंतर तो मला म्हणाला की, 'तू माझ्यासाठी लकी आहेस, चल आपण लग्न करूया.' एकदम साध्या सिंपल अंदाजात त्याने मला प्रपोज केलं. त्यानंतर आम्ही 6 ते 7 महिन्यांतच लग्न केलं." जरीही इतक्या साध्या सोप्या अंदाजात ते एकमेकांना आवडू लागले असले तरीही त्यांचा संसार जेमतेम 13 वर्षेच टिकला. घटस्फोट कोणत्या कारणासाठी घेतला? याचं कारण हनी यांनी सांगितलं. हनी इराणी म्हणाल्या की, "माझा आणि जावेदचा नक्की कोणत्या कारणामुळे घटस्फोट झाला, याचं कारण मला आजही देता येणार नाही. सर्व गोष्टी खूप पटापट घडत गेलं, त्यामुळे मला काहीही कळालंच नाही. असं म्हणतात की, यश मिळाल्यावर माणूस बदलतो, त्याचप्रमाणे जावेदचंही असंच काहीसं झालेलं.
तसंच त्याचंही आयुष्य बदललं आणि त्याच्या सभोवतालचंही आयुष्य बदलत गेलं. कदाचित मला त्याच्या बदलांशी जुळवून घेता आलं नाही. त्यात त्याला एक सवय लागलेली, ती म्हणजे दारू पिण्याची. तो दररोज वेगवेगळ्या लोकांना भेटायचा. त्यामुळे रोज तो सायंकाळी बाहेर राहायचा. त्याचं बाहेर राहण्याचं प्रमाण वाढतंच चाललं होतं. शेवटी आम्हाला दोघांनाही आमचं नातं पुढे टिकणार नाही, असं जाणवायला लागलं. त्याने त्याची दारू सोडण्याचाही प्रयत्न केला. पण ते काही झालं नाही. "
पुढे त्या म्हणाल्या, " उगाचच कुठल्या गोष्टीसाठी वाद घालण्यापेक्षा आणि आपल्या जोडीदाराला त्रास देण्यापेक्षा वेगळं होण्याचा निर्णयच योग्य वाटला. वेगळा होण्याचा निर्णय कोणाचा एकट्याचा नव्हता, तो दोघांनीही मिळून घेतला होता. मीसुद्धा तेव्हा खूप लहान होते, त्यामुळे सगळा दोष मी जावेदला देत नाही. आम्ही खूप लवकर लग्न केलं. कदाचित थोडा वेळ थांबलो असतो, तर लग्नच झालं नसतं." मुलाखतीत पुढे हनीला जावेद आणि त्यांची सध्याची पत्नी शबाना आझमी यांच्या नात्याबद्दल विचारले. "जावेद आणि शबानाबद्दल मला कायमच आदर आहे. शबानासोबत नाते जोडण्यासाठी त्याला खूप वेळ लागला. कारण मुलंही त्यामध्ये होते. जावेद आणि शबाना दोघांनीही मैत्री केली. आता त्यांच्यातलं नातं व्यवस्थित असून सर्व काही व्यवस्थित आहे.", अशी प्रतिक्रिया हनी इराणी यांनी दिली.
