चित्रपटाची घोषणा होताच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच दिल्ली उच्च न्यायालयामध्ये चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. ब्राह्मण समाजातील काही संघटनांनी चित्रपटाच्या टायटलवरून आक्षेप घेतला असून आक्षेपार्ह आणि बदनामीकारक असल्याचे याचिकेत म्हटले आहे, या कारणामुळे ब्राह्मण समाजाने न्यायालयाचे दार ठोठावले आहे. संपूर्ण वादावर चित्रपटातील मुख्य अभिनेता मनोज बाजपेयीने पोस्ट शेअर केली आहे, त्याने शेअर केलेल्या एक्स (ट्वीटर) पोस्टमध्ये दिग्दर्शक नीरज पांडे यांचे अधिकृत विधान शेअर करून प्रतिक्रिया दिली.
advertisement
मनोजने पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, "मी नेहमीच लोकांच्या भावनांचा आणि संबंधितांच्या विचारांचा आदर करतो. मी त्या गांभीर्याने घेतो. जेव्हा तुम्ही ज्या गोष्टीचा भाग आहात, त्यामुळे काही लोक दुखावतात, तेव्हा ते तुम्हाला थांबून ऐकायला भाग पडते. एक अभिनेता म्हणून, मी जे पात्र साकारत असलेल्या कथेतून चित्रपटाकडे येतो, त्यासंबंधित मला विचार करायला भाग पडतेच. हे कोणत्याही समुदायाबद्दल विधान नव्हते. नीरज पांडेसोबत काम करण्याच्या माझ्या अनुभवात, तो स्वत:च्या चित्रपटाकडे कसा पाहतो, ही गोष्ट महत्त्वाची बाब आहे. चित्रपट निर्मात्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेऊन प्रमोशनल मटेरियल काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून चिंता किती गंभीरतेने घेतली जात आहे हे दिसून येते."
महेंद्र चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीने वकील विनित जिंदाल यांच्या मदतीने दाखल केलेल्या चित्रपटाचे ओटीटीवर प्रदर्शन थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘पंडत’ हा शब्द चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याबद्दल चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या एक्स पोस्टमध्ये निर्मात्यांनी लिहिले की, " 'घुसखोर पंडत' चित्रपटाचे कथानक काल्पनिक आहे. ‘पंडत’ हे नाव फक्त एका काल्पनिक पात्राचे नाव म्हणून वापरले आहे. चित्रपटाचे कथानक एका व्यक्तीच्या कृती आणि निर्णयांवर आधारलेले आहे. ते कोणत्याही जात, धर्म किंवा कोणत्याही समजावर टिप्पणी करत नाही, एक चित्रपटाचा निर्माता म्हणून कथा पूर्णपणे विचारपूर्वक सांगणे हाच आमचा उद्देश आहे. आधीच्या चित्रपटांप्रमाणेच मी या चित्रपटातही प्रेक्षकांपर्यंत कथा व्यवस्थितपणे पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. हा चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच बनवला आहे. बाकी माझा कोणताही वेगळा उद्देश नाही."
"चित्रपटाच्या टायटलमुळे काही प्रेक्षक दुखावले असतील तर, आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो. यामुळे आम्ही चित्रपटासंबंधित जाहिराती आणि आणि इतर प्रमोशनल कंटेंट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करण्यास उत्सुक आहोत."
