चीनचा जळफळाट आणि भारताचा जबरदस्त पलटवार
चित्रपटाचा टीझर पाहिल्यावर चिनी तज्ज्ञ आणि तिथल्या सरकारी माध्यमांनी थयथयाट सुरू केला. "चित्रपट बनवून इतिहास बदलता येत नाही," असं म्हणत त्यांनी आपली जळजळ व्यक्त केली. पण भारतानेही मंगळवारी यावर कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलं की, "भारतात कलात्मक स्वातंत्र्य आहे आणि आपल्या सैनिकांचं शौर्य पडद्यावर मांडण्याचा अधिकार भारतीय दिग्दर्शकांना नक्कीच आहे. चीनने यात ढवळाढवळ करण्याची गरज नाही."
advertisement
काय घडलं होतं?
हा चित्रपट २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षावर आधारित आहे. १५ जून २०२० ची ती रात्र भारत-चीन संबंधांमधील ४५ वर्षांतील सर्वात भीषण रात्र ठरली होती. भारतीय लष्कराच्या १६ बिहार रेजिमेंटने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी सैन्याला जी धूळ चारली होती, तोच ज्वलंत इतिहास या सिनेमात मांडला गेला आहे. हा चित्रपट शिव अरोरा आणि राहुल सिंग यांच्या ‘इंडियाज मोस्ट फियरलेस ३’ या पुस्तकावर आधारित आहे.
कर्नल संतोष बाबूंच्या भूमिकेत सलमान खान
चित्रपटात सलमान खान याने कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांची मुख्य भूमिका साकारली आहे. टीझरमधील सलमानचा कडक लष्करी गणवेश, त्याच्या डोळ्यातील आग आणि भारदस्त संवाद सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहेत. "शौर्य अमर असते, पण खरा विजय शांततेतच असतो," हा संदेश देणारा सलमानचा लूक पाहून चाहत्यांनी या सिनेमाला आताच ब्लॉकबस्टर घोषित केलं आहे. सलमानसोबतच या चित्रपटात चित्रांगदा सिंग, झेन शॉ आणि अंकुर भाटिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. एप्रिल २०२६ मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर धडकण्याची शक्यता आहे.
‘बॅटल ऑफ गलवान’ मुळे का होतोय चीनचा जळफळाट?
चीनला भीती आहे ती त्यांच्या सैन्याच्या पराभवाचं सत्य जगासमोर येण्याची. गलवानमध्ये भारतीय जवानांनी प्राणांची आहुती देत जो प्रतिकार केला, त्या शौर्याची गाथा आता जागतिक स्तरावर सलमान खानच्या चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचणार आहे. यामुळेच चिनी यंत्रणांनी या सिनेमाला आतापासूनच लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.
