दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. दिवाणखवटीजवळ ट्रॅकवरील दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल आहे. तिथला मलबा हटवण्याचे काम सुरू आहे, मात्र अति मुसळधार पावसामुळे काही अडचणी येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याची माहिती कोकण रेल्वेनं आपल्या ट्विटर हॅण्डलवर दिली आहे. प्रवाशांना वेळापत्रक आणि ट्रेनचं स्टेटस पाहूनच बाहेर पडावं असं आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
आजही कोकण पट्ट्यात अति मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाने दिलं आहे. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तर दुसरीकडे छोटे-मोठे नदी नाले सुद्धा धोकादायक बनले आहेत त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दापोली तालुक्यातील जामगे सातेरे नदीने धोक्याची पातळी ओलांडण्याने नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने नदीपलीकडच्या सात गावांचा संपर्क तुटला आहे तर या ठिकाणची वस्तीला गेलेली एसटी अडकून पडली आहे. गेले दोन दिवस नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने शाळकरी मुले तसेच रुग्णांचे हाल सुरू आहेत.
