शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत हे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. पण नारायण राणेंना इथून उमेदवारी दिल्याने त्यांनी माघार घेतली. रामदास कदम म्हणाले की, शिवसेनेला जागा मिळेल अशी अपेक्षा होती पण हरकत नाही. याची कसर आम्ही विधानसभेत भरून काढू. सध्या दुधाची तहान ताकावर भागवतोय.
नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्हा सर्वांचे प्रयत्न आहेत. आम्हाला नारायण राणे नाही,तर नरेंद्र मोदी महत्त्वाचे आहेत. विधानसभेत शिवसेनेचा झंझावात दिसून येईल असा विश्वाससुद्धा रामदास कदम यांनी व्यक्त केला. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून होणाऱ्या टीकेवर रामदास कदम यांनी इशारा देत म्हटलं की, भाजपाने माझ्याविरोधात काम केलं तर त्याचे परिणाम राज्यात दिसतील.
advertisement
मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावरही रामदास कदम यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की, वैभव खेडेकर हा महाराष्ट्रातला सर्वात भ्रष्ट नगराध्यक्ष आहे. राज ठाकरेंचा फोन आला म्हणून मी शांत बसलो, अन्यथा अजून सात आठ गुन्हे दाखल झाले असते. वैभव खेडेकर हा नावाला मनसेत, प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचे अनिल परब, सदानंद कदम,आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम करतो. मला संपवायला निघाला तर मी सोडेन का ? रामदास कदम यांचा वैभव खेडेकर यांना थेट इशारा दिला.
