असंसर्गजन्य रोगांचा वाढता प्रभाव
अपोलो हॉस्पिटलच्या अहवालानुसार भारतात कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तीनपैकी एक भारतीय प्री-डायबेटिक स्थितीत आहे आणि 10 पैकी एक व्यक्ती प्री-हायपरटेन्शनचा बळी ठरत आहेत. अनेक तरुणांना लठ्ठपणाचाही त्रास होत असल्याचं अहवालात म्हटलं आहे. तरुणांमधील मानसिक आरोग्याच्या समस्याही झपाट्याने वाढत आहेत. या सगळ्याचा परिणाम आपल्या देशातील प्रत्येक गोष्टीवर होत आहे. देशातील तरुण निरोगी राहिले नाहीत तर आपली अर्थव्यवस्था कमकुवत होऊ लागेल. आजच्या तरुणांमधील मानसिक आरोग्याच्या समस्या हे या सगळ्यामागील सर्वात मोठं कारण आहे. विशेष म्हणजे त्याकडे फारसे लोक लक्षही देत नाहीत.
advertisement
कमी वयात शरीरावर विविध आजारांचं आक्रमण
अपोलो हॉस्पिटलमधील प्रीव्हेंटिव्ह हेल्थ विभागाच्या सीईओ डॉ. सत्या श्रीराम यांनी न्यूज 18शी बोलताना सांगितलं की, आपल्याला आपल्या देशातील लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा अभिमान आहे. कारण, आपली बहुसंख्य लोकसंख्या तरुण आहे. मात्र, कॅन्सरसारख्या आजारांचा या तरुणांना मोठ्या प्रमाणात विळखा बसत आहे. त्यामुळे भारताला या लोकसंख्येच्या कार्यक्षमतेतून मिळणारा म्हणावा तसा फायदा मिळणार नाही. पूर्वी जे आजार वृद्धांना व्हायचे ते आजार आता तरुणांनाही होत आहेत. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. डॉ. सत्या म्हणाल्या की, या आजारांमागे 'तणाव' हा सर्वात जास्त कारणीभूत असलेला घटक आहे. तणावानंतर एंग्झायटी, लठ्ठपणा, थकवा, झोपेचा आणि स्टॅमिनीचा अभाव हे घटक लो प्रॉडक्टिव्हिटीसाठी कारणीभूत आहेत.
तणाव हा सर्वात मोठा धोका
डॉ. सत्या यांनी सांगितलं की, 18 ते 30 वर्षे वयोगटातील 11 हजार व्यक्तींशी चर्चा केली असता त्यातील 80 टक्के व्यक्तींनी आपल्या आयुष्यात ताणतणाव असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर अस्वस्थता, नैराश्य, थकवा, झोप न लागणे, स्टॅमिनाचा अभाव हीदेखील या आजारांची महत्त्वाची कारणे ठरत आहेत. डॉ. सत्या म्हणाल्या की, जर दीर्घकाळ तणाव असेल आणि तो शरीरात कायमचा स्थिरावला तर तो शरीरासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. जर कमी कालावधीसाठी तणाव असेल तर काहींसाठी तो प्रेरणादायक देखील ठरतो. काही लोक अल्पकालीन तणावानंतर कामावर लक्ष केंद्रीत करतात. पण, दीर्घकालीन तणाव अनेक प्रकारच्या मानसिक आजारांना जन्म देतो.
हे आजार कसे टाळायचे?
डॉ. सत्या श्रीराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सर, हायपरटेंशन, डायबेटिस यांसारख्या क्रॉनिक आजारांपासून दूर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अधिकाधिक लोकांनी आपली वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे. म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांमध्ये जागृती झाली पाहिजे आणि त्यांनी स्वतः आपल्या आरोग्याबाबत जागरूक झालं पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी अत्यावश्यक आजारांची तपासणी करून घेतली पाहिजे. पण, आपल्या देशात जोपर्यंत आजारपण वाढत नाही तोपर्यंत चाचणी केली जात नाही. त्यामुळे बहुतांशी कॅन्सर प्रकरणांची नोंद अॅडव्हान्स स्टेजमध्ये होते. परदेशातील लोक त्यांच्या आरोग्याबाबत अत्यंत सजग असतात आणि ते वेळोवेळी आपली आरोग्य तपासणी करत असतात. शासनानेसुद्धा प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. सत्या म्हणाल्या. यासोबतच कॉर्पोरेट जगतानेही या मोहिमेत सहभागी होण्याची गरज आहे.
