डायबिटीस किंवा मधुमेह म्हणजे काय ?
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रक्तातली वाढलेली साखर म्हणजे डायबिटीस. आपण जेव्हा काहीही खातो तेव्हा आपलं शरीर त्या पदार्थांचं रूपांतर साखरेत करतं आणि ही साखर रक्तात सोडली जाते. रक्तात आलेली साखर नियंत्रणात ठेवण्याचं काम पॅक्रियाज म्हणजे स्वादूपिंडातून निघणारं इन्सुलिन करतं. जेव्हा तुम्ही तरूण असता तेव्हा तुम्ही कितीही, काहीही खाल्लं तरी तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात राहते. मात्र काही अनुवंशिक कारणं किंवा जेवणाच्या चुकीच्या सवयींमुळे तुमच्या शरीराच्या कार्यात बिघाड होतो, तेव्हा स्वादूपिंडातून इन्सुलिन स्रवण्याचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात न राहता तिचं प्रमाण वाढू लागतं.
advertisement
प्रि- डायबिटीक ही डायबिटीसची एक सुरूवात मानली जाते. अशा व्यक्तींमध्ये काही खाल्ल्यानंतर रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं. मात्र काही तासांनंतर हे प्रमाण नियंत्रणात येतं. त्यामुळे प्रि-डायबिटीक व्यक्तींनी योग्य काळजी घेतल्यास ते डायबिटीसला दूर ठेऊ शकतात
डायबिटीस किंवा मधुमेह म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर जाणून घेऊयात डायबिटीसचे प्रकार किती आहेत ते.
टाईप 1 डायबिटीस :
मुलांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या शरीरात व्यंग निर्माण झाल्यामुळे होणाऱ्या मधुमेहाला टाईप 1 डायबिटीस असं म्हटलं जातं. जन्मजात व्यंगामुळे स्वादुपिंड इन्सुलिन तयार करू शकत नाही. त्यामुळे टाईप 1 डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींना कृत्रिम इन्सुलिनवर अवलंबून राहावं लागतं.
हे सुद्धा वाचा : Exercise for diabetes डायबिटीसला दूर करायचं आहे, मग करा करा ‘हे’ साधे सोपे व्यायाम
टाईप 2 डायबिटीस :
हा डायबिटीसचा एक प्रकार आहे.याला डायबिटीस मेलिटस असंही म्हणतात. योग्य आहार आणि व्यायामामुळे हा डायबिटीस परतवून लावता येऊ शकतो.
गर्भावस्थेतला डायबिटीस :
हा डायबिटीसचा एक नवीन प्रकार आहे. जो गर्भावस्थेतल्या शेवटच्या टप्प्यात होतो. काही कारणांमुळे गर्भवती महिलांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं. मात्र प्रसूतीनंतर हा डायबिटीस बरा होतो.
काहीही खाल्ल्यानंतर रक्तातली साखर वाढणं म्हणजे डायबिटीस हे आपल्याला माहिती आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, फक्त गोड खाल्ल्यामुळेच रक्तातली साखर वाढते. त्यामुळे तुम्हालाही डायबिटीस असेल आणि तुम्हाला तो जर नियंत्रणा ठेवायचा आहे जर खाली दिलेले पदार्थ खाणं टाळा म्हणजे तुमच्या रक्तातली साखर आपसूकच नियंत्रणात राहील.
डाएट मंत्रा क्लिनिकच्या वरिष्ठ आहारतज्ञ कामिनी सिन्हा सांगतात की, ‘उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ रक्तात साखर जलदरित्या सोडतात. त्यामुळे डायबिटीस असलेल्या रूग्णांनी कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असलेल्या अन्नाचं सेवन करायला हवं. म्हणजे त्यांच्या रक्तातल्या साखरेची पातळी फक्त नियंत्रणातच नाही तर स्थिर राहील.’
हे पदार्थ टाळल्याने रक्तातली साखर राहील नियंत्रणात
गोड पदार्थ :
मिठाई, केक, कुकीज आणि इतर गोड पदार्थांचं सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी वाईट मानलं जातं. याशिवाय कोल्ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स यांसारख्या साखरयुक्त पेयांचे सेवन करणे खूप हानिकारक असू शकते.
कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ :
व्हाईट ब्रेड आणि पास्ता यांसारख्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या रूग्णांनी हे पदार्थ खाणं टाळायला हवं. त्याऐवजी, कडधान्ये किंवा भरड धान्य खाणं डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायद्याचं ठरू शकतं.
जंकफूड, तळलेले पदार्थ :
समोसा, फ्रेंच फ्राईज, पिझ्झा आणि बर्गर यांसारख्या तळलेल्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज आणि फॅट्स भरपूर असतात, ज्यामुळे वजन वाढू शकतं. त्यामुळे साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते. चिप्स, कुरकुरे आणि इतर प्रक्रिया केलेल्या स्नॅक्समध्ये चरबी, मीठ आणि साखर जास्त प्रमाणात असते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरते.
असं म्हटलं जातं की, चालणं हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे आणि झोपेमुळे मन शांत राहायला मदत होतं. त्यामुळे योग्य संतुलित आहारासोबत जर तुम्ही व्यायाम केलात आणि तणावविरहीत जरी राहिलात तरीही तुमचा डायबिटीस नियंत्रणात राहू शकतो. कारण अपुरी झोप आणि सततचा तणाव यामुळे डायबिटीस वाढतो.