अलीकडच्या काळात व्हिटॅमिन डी आणि बी 12 कमतरतेची तक्रार सर्रास ऐकायला मिळते. त्यामुळे औषधं घेतली जातात. कारणाशिवाय आणि गरजेपेक्षा जास्त घेतलेली मल्टिव्हिटॅमिन्स अनेक तक्रारींना निमंत्रण देऊ शकतात हे लोकांना माहिती नसतं. डॉक्टरांच्या मते मल्टिव्हिटॅमिन्स ही जेवणातून मिळणं आवश्यक असतं.
कुठलीही सप्लिमेंट्स म्हणजे गोळ्या औषध स्वरुपात घेतलेली मल्टिव्हिटॅमिन्स पुरेशी ठरत नाहीत. त्यामुळेच भरपूर चौरस आहार घेणं महत्त्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त मल्टिव्हिटॅमिन्स घ्यायची असतील तर ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणंच योग्य ठरतं.
advertisement
लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. एल. एच. घोटेकर सांगतात की, शरीरातील कमतरतेचं प्रमाण किती आहे यावर मल्टिव्हिटॅमिन्स खाणं अवलंबून आहे. हाडांमध्ये वेदना, सांधेदुखी, झोप न लागणं, थकवा येणं अशी अनेक लक्षणं ही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे जाणवू शकतात. व्हिटॅमिन डी आणि बी 12 च्या कमतरतेमुळे ही लक्षणं दिसतात. तशी लक्षणं असतील तर व्हिटॅमिन टेस्ट करावी.
कमतरता असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी सांगितलं तर मल्टिव्हिटॅमिन्स घेण्यास सुरुवात करावी. ‘व्हिटॅमिन डी’ चा डोस आपल्या मनाने घेऊ नये. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणातच ते घ्यावं, असंही डॉ. घोटेकर यांनी स्पष्ट केलं.
डॉ. घोटेकर पुढे म्हणाले, तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त मल्टिव्हिटॅमिन्स घेत असल्यास त्याचा ओव्हरडोस होण्याची शक्यता असते. तुम्ही आवश्यक टेस्ट्स न करता औषधं घेत असाल तर त्यामुळेही ओव्हरडोस होण्याची शक्यता असते.
असा ओव्हरडोस किडनी आणि लिव्हरवर परिणाम करतो. त्यामुळे अनेक गंभीर आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता असते, असा इशाराही त्यांनी दिला. मल्टिव्हिटॅमिन्स घेण्याची गरज पडू नये यासाठी आहारात पनीर, दूध, दही, डाळी, हिरव्या पालेभाज्या, अंडी यांचा समावेश असणं आवश्यक आहे.
या पदार्थांमधून शरीराला आवश्यक असलेली सर्व व्हिटॅमिन्स मिळतात. त्यामुळे जीवनसत्वांच्या कमतरतेची शक्यता कमी होते. कोणतीही औषधं जाहिरातींमध्ये बघून खरेदी न करता डॉक्टरांना विचारुन घेतली असता त्यांच्या दुष्परिणामांचा धोका टाळता येणं शक्य आहे.
