कितीही समस्या असतील तरी तुम्हाला केस लांब, दाट आणि निरोगी ठेवायचे असतील, तर काही पूर्वापार चालत आलेले उपाय नक्की करुन पाहा. म्हणतात जुनं ते सोनं, केसांच्या सगळ्या समस्यांवर हे उपाय नक्की करुन पाहता येतील.
ब्राह्मी तेल - ब्राह्मी तेल केसांसाठी एक उत्तम उपाय मानलं जातं. हे ब्राह्मी वनस्पतीपासून मिळवलं जातं. यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, यामुळे केसांचं पोषण होतं आणि केसांची मुळं मजबूत होतात.
advertisement
Summer Care : उन्हाळ्यात राहा ठंडा ठंडा कुल कुल, जाणून घ्या कोरफडीच्या रसाची आरोग्यकारक उपयुक्तता
हे तेल कोमट करून दहा-पंधरा मिनिटं टाळूवर मालिश करा. तेल कमीतकमी तीस मिनिटं किंवा रात्रभर तसंच राहू द्या. दुसऱ्या दिवशी केस धुवा. आठवड्यातून दोनदा हे तेल वापरू शकता.
भृंगराज तेल - आयुर्वेदात भृंगराजला केशराज म्हणूनही ओळखलं जातं. या तेलाच्या वापरामुळे केस मजबूत होतात, चमकदार आणि मऊ बनतात. भृंगराज तेल हे भृंगराजाच्या पानांपासून बनवलं जातं. केस गळणं किंवा टक्कल पडणं यांसारख्या समस्या असतील, तर भृंगराज तेल खूप चांगला पर्याय आहे. केसांच्या वाढीसाठी हा सर्वौत्तम उपाय मानला जातो. तेल गरम करून टाळूवर व्यवस्थित चोळा. तीस-चाळीस मिनिटं किंवा रात्रभर तसंच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूनं धुवा. याचा वापर आठवड्यातून दोन-तीन वेळा करता येतो.
आवळा तेल - आयुर्वेदात आवळ्याला आरोग्याचा खजिना मानलं जातं, कारण त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि विविध खनिजं असतात, केसांच्या वाढीसाठी हे आवश्यक घटक आहेत. आवळा तेलामुळे केसांचं पोषण होतं, केस तुटण्यापासून वाचवतं आणि केसांची वाढ वेगानं होते.
आवळ्याचं तेल खोबरेल तेलात मिसळा आणि केसांना व्यवस्थित लावून मालिश करा. एका तासानंतर, सौम्य शाम्पूनं केस धुवा. आठवड्यातून हे तेल दोन-तीन वेळा करू शकता.
केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे?
तेल नेहमी थोडंसं गरम करा. कोमट तेलामुळे ते केसांच्या मुळांपर्यंत खोलवर जातं आणि त्याचा परिणाम दिसण्यास मदत होते.
तेल लावताना, बोटांनी टाळूवर हळुवारपणे मालिश करा. बोटांच्या टोकांनी मालिश करायचं, नखांनी नाही. अशाप्रकारे मालिश केल्यानं टाळूतील रक्ताभिसरण वाढतं.
तेल लावल्यानंतर, ते केसांमधे किमान दोन ते तीन तास राहू द्या. रात्री तेल लावून सकाळी धुणं अधिक फायदेशीर ठरतं.
