मुंबई : पावसाळा जून महिन्यापासून सुरू होत असला तरी हिरवळ मात्र श्रावणात दाटते. त्यामुळे या महिन्यात सर्वत्र अत्यंत प्रसन्न वातावरण असतं. शिवाय श्रावणापासून सणवार सुरू होत असल्यानं घरोघरी गोडधोड पदार्थ बनवले जातात. कोकणात या दिवसांमध्ये रव्याची खीर ठरलेलीच असते. ही खीर चवीला एवढी भारी लागते की, एका वाटीवर खवय्यांचं भागत नाही.
advertisement
सणावारानिमित्त घरी पाहुणीमंडळींची रेलचेल असते. त्यांच्यासाठी आपण ही झटपट होणारी खीर नक्कीच बनवू शकता. तसंच श्रावणी सोमवारी करावयाचा हा गोडाचा उत्तम पदार्थ आहे.
रव्याच्या खिरीसाठी लागणारे साहित्य :
- 1 वाटी रवा
- 2 मोठ्या वाट्या दूध
- 1 वाटी साखर
- काजू-बदामाचे तुकडे
- वेलचीपूड चवीनुसार
- 1 ग्लास पाणी
- थोडं तूप
रव्याच्या खिरीची कृती :
सर्वात आधी गॅस सुरू करून त्यावर एक पातेलं ठेवा. पातेल्यात तूप घेऊन त्यात रवा खरपूस भाजून घ्या. रवा चांगला लालसर झाला की एका वाटीत काढा. आता तुपात कापलेले काजू, बदामाचे तुकडे परतून घ्या. त्यानंतर दूध आणि पाणी तापवा. पुन्हा गॅसवर नवी कढई ठेवून त्यात तूप आणि लालसर भाजलेला रवा घ्या. त्यात थोडं गरम पाणी घाला आणि रवा व्यवस्थित शिजू द्या.
रवा शिजल्यावर 5 मिनिटांनी त्यात तुपात परतलेले काजू, बदामाचे तुकडे घाला. मग साखर घालून 5 मिनिटं थांबा. साखर रव्यात व्यवस्थित विरघळली की चवीनुसार वेलचीपूड घाला. आता शेवटी मिश्रणात गरम दूध ओता आणि खीर 5 मिनिटं शिजू द्या. आपल्याला हवी तशी खीर आटवून घ्या किंवा पातळ ठेवा. आपण वरून केशरही घालू शकता. अशाप्रकारे स्वादिष्ट अशी गरमागरम रव्याची खीर तयार आहे.