संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा, नौकाविहार, वाघ-सिंह सफारी, निसर्ग माहिती केंद्र आदींबरोबरच 'वनराणी' ही देखील पर्यटकांचे आकर्षण होती. मुलांबरोबरच त्याचे पालकही 'वनराणी' या मिनी टॉय ट्रेन' मधून उद्यानाची सफर करत मजा लुटत होते. मात्र, 2021 मध्ये आलेल्या 'तौक्ते' चक्रीवादळात राष्ट्रीय उद्यानात शेकडो वृक्षांची पडझड झाली. तसेच अनेक रस्ते देखील उखडले गेले. तेव्हा ‘वनराणी’च्या एका वळणावर झाडे पडल्याने रुळांसह स्लीपर्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ही ट्रॉय ट्रेन बंद झाली होती.
advertisement
Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी खूशखबर! गणेशोत्सवासाठी 5000 जादा बस, कधी सुरू होणार बूकिंग?
2.3 किलोमीटरचा नवा मार्ग
‘तौक्ते’ चक्रीवादळात वनराणीचा 2.3 किलोमीटराच्या मार्गाचे नुकसान झाले होते. त्यामुळे आता वनराणी पुन्हा सुरू करताना हा मार्ग पूर्णत: नव्याने बांधावा लागला आहे. गेल्या वर्षी या मार्गाचे काम सुरू झाले होते. त्यामुळे आता तब्बल 5 वर्षांनी वनराणी पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
कशी असेल वनराणी?
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी ही ट्रॉय ट्रेन पूर्वी डिझेलवर धावत होती. आता ती नव्या रुपात दाखल होणार असून विजेच्या शक्तीवर धावणार आहे. या गाडीला चार डबे असतील. मार्गावरील स्थानकांचे, कृत्रिम बोगद्याचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच रुळ देखील नवीन बसविण्यात आले आहेत.
1974 ला वनराणी सुरू
राष्ट्रीय उद्यानात 1974 मध्ये वनराणी पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती. वनराणीच्या माध्यमातून उद्यानाला दरवर्षी सुमारे 50 लाख रुपयांचा महसूल मिळत होता. तेव्हा गाडीची रचना आकर्षक होती. छोटेखानी इंजिन आणि त्याला जोडलेले चार डबे अशी वनराणी उद्यानाच्या हिरव्यागार झाडीतून धावत होती. एका गाडीच्या प्रत्येक डब्यात 16 असे 64 प्रवासी सैर करत होते. साधारणपणे एक फेरी 30 मिनिटांची होती. आता वनराणी नव्याने सुरू होत असल्याने पर्यटकांसाठी पर्वणी असणार आहे.