पुणे हे राज्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असल्यामुळे देशभरातून हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. त्यातील अनेक विद्यार्थी मेस आणि खानावळींवर अवलंबून असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅस उपलब्ध होत नसल्याने जेवण बनवणेच कठीण झाले आहे. त्यामुळे काही मेस पूर्णपणे बंद ठेवाव्या लागत आहेत, तर काही ठिकाणी जेवणाचे दर वाढवले गेले आहेत. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.
advertisement
व्यावसायिक प्रसन्न भावे यांनी सांगितले की, गॅस मिळत नसल्याने जेवण बनवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून आमची मेस पूर्णपणे बंद ठेवावी लागली आहे. गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून ते परवडत नाहीत. त्यामुळे अनेक मेस आणि हॉटेल्स बंद होत आहेत, तर काहींनी जेवणाचे दर दुप्पट केले आहेत. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आता पेरणीचं काम होणार सोपे, सोलापुरातील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र, किंमत किती? Video
दरम्यान, कॅन्टीन आणि शिवभोजन केंद्र चालवणारे व्यावसायिक राकेश नेवास्कर यांनीही सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, उन्हाळा वाढत असताना व्यावसायिकांनाही मोठे चटके बसत आहेत. गॅसचे दर 4500 ते 5 हजार रुपयांपर्यंत घेतले जात आहेत. त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस सुट्टी द्यावी लागत आहे. सरकारकडून गॅस 50 टक्के मिळेल असे सांगितले जात असले तरी एजन्सीकडे गेल्यावर अजून पुरवठा झालेला नाही, असे सांगितले जाते. ही परिस्थिती कायम राहिली तर व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
शहरातील विविध पेठांमध्ये चहा-नाश्त्याच्या अनेक दुकानांवरही याचा परिणाम दिसून येत आहे. काही ठिकाणी दुकाने तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे रोजगारावरही परिणाम होत असून कामगार आणि छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही स्वस्तात जेवण मिळणे कठीण झाले आहे.
गॅसचे वाढलेले दर आणि कमी उपलब्धता यामुळे विद्यार्थ्यांनाही जास्त पैसे मोजावे लागत आहेत. काही ठिकाणी दोन विद्यार्थी मिळून एकच डबा घेत असल्याचेही चित्र दिसत आहे. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांनी तात्पुरते घरी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शैक्षणिक वातावरणावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
20 ते 25 रुपयांचे पोहे आता 35 रुपयांना झाले असून रविवारी तर जेवणच मिळत नाही. विद्यार्थी चे जेवणाचे हाल होत आहेत. त्याचा परिणाम अभ्यासावर होत असून मुलं आता गावी जात आहेत. अशी माहिती विद्यार्थी प्रकाश यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये गॅस किंवा जेवणाची विशेष सोय उपलब्ध करून द्यावी, तसेच सार्वजनिक पोळी-भाजी केंद्र सुरू करावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. अन्यथा अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. अशी माहिती विद्यार्थी नितीन आंधळे यांनी दिली आहे.
एकूणच, आखाती देशांतील युद्धाचा परिणाम केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर स्थानिक पातळीवरही जाणवत आहे. गॅस टंचाईमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत होण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा विद्यार्थी आणि व्यावसायिक व्यक्त करत आहेत.





