मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये महायुती आगामी निवडणुकीत कशा प्रकारे लढणार आहे, स्पष्ट केलं. एकंदरीतच पालिका निवडणुकीत महायुतीत फाटाफूट होणार असल्याचं आता लपून राहिलेलं नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला अनेक राजकीय कंगोरे आहेत. महापालिका निवडणुकांसाठी ही सत्ताधाऱ्यांची खेळी असल्याचं मानलं जातंय. ज्या महापालिकेत महायुतीतील पक्ष तुल्यबळ आहेत त्या ठिकाणी विरोधकांना फायदा होऊ नये अशी ही खेळी आहे. विरोधकांना राजकीय फायद्यापासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं ही रणनिती आखली आहे.
advertisement
वेगवेगळं लढल्यास सर्व फोकस महायुतीच्या घटक पक्षांवर केंद्रित होईल. त्यामुळे विरोधकांना जागा उरणार नाही. तसंच एकट्याने लढून राजकीय ताकद वाढवण्यावर भाजपचा भर असणार आहे. एवढंच काय पण निकालानंतर सत्तेसाठी सर्व पर्यायही खुले राहणार आहेत. निवडणुकीत विरोधकांसाठी जागा शिल्लक राहू नये अशी भाजपची राजकीय चाल आहे. पण त्यांची स्ट्रॅटर्जी राजकीय सारिपाटावर कितपत यशस्वी ठरणार याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहे.
ठाकरे बंधूंची एकी, शरद पवारांची साथ आणि कांग्रेस सोबत असेल तर महायुतीची स्ट्रॅटर्जी कितपत परिणामकारक होऊ शकते, असाही प्रश्न आहे. विरोधक एकत्र लढल्यास किंवा विरोधक वेगवेगळे लढल्यास राज्यात काय चित्र निर्माण होईल? या विषयी आताच ठामपणे कुणी सांगू शकणार नाही.
कोणाची स्ट्रॅटर्जी यशस्वी होणार?
विरोधक आता विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरत आक्रमक होत आहेत. तर भाजपनं वेगवेगळं लढून जिंकण्याची रणनिती आखलीय. मात्र त्यांची ही स्ट्रॅटर्जी दुधारी तलवारही ठरू शकते. कारण विरोध एकत्रितपणे नवं समीकरण निर्माण करू शकतात. आता कुणाची स्ट्रॅटर्जी यशस्वी होते, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.