वादाचं नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पहाडी पारगाव येथील शेतकरी बाळकृष्ण अंडील यांच्या शेतातील पानंद रस्त्यावर काही जणांनी दगड टाकले होते. "रस्त्यावर दगड का टाकले?" अशी विचारणा बाळकृष्ण यांनी केली असता, आरोपींनी संतापून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. साध्या विचारणेवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले.
नऊ जणांचा हल्ला, तिघे जखमी
advertisement
या प्रकरणात एकूण नऊ आरोपींनी मिळून बाळकृष्ण अंडील यांच्यासह तिघांना दगडांनी बेदम मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी "कत्तीने तुमचे हातपाय तोडून टाकू" अशी गंभीर धमकी दिल्याचे पीडितांनी सांगितलं. या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीवर अंबाजोगाई येथील स्वाराती (स्वामी रामानंद तीर्थ) रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
पोलिसांत गुन्हा दाखल आणि तपासाचे आव्हान
याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात नऊ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पानंद रस्त्यांचे वाद जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी धुमसत असताना, पहाडी पारगावमधील या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा सखोल तपास धारूर पोलीस करत आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
