अहमदनगर, 26 ऑगस्ट : अहमदनगर लोकसभा निवडणुकीत दक्षिणेतून खासदार डॉ. सुजय विखे उमेदवार असतील, असे समजून भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तर दक्षिणेतून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच उमेदवारी करावी, असा आग्रह धरला आहे. त्यात शिवसेनेनेही दक्षिणेच्या जागेवर दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीकडून आमदार निलेश लंके यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, ते आता अजित पवार यांच्यासोबत असल्याने शरद पवार गटाकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेमध्ये नगर दक्षिण मूळ कोणाला तिकीट मिळतं आणि कुणात लढत होईल हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
advertisement
2019 च्या निवडणुकीत नगर दक्षिण मतदार संघातून डॉक्टर सुजय विखे यांच्या अचानक झालेल्या युतीमुळे सर्वांना धक्का बसला होता. त्यावेळेस स्टॅंडिंग खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांना तिकीट नाकारून सुजय विखे यांना तिकीट देण्यात आले होते. त्या निवडणुकीत सुजय विखे यांचा लाखोंच्या मतांनी विजय झाला. त्यानंतर त्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेत त्यांनाच या वेळेस तिकीट मिळेल त्या अनुषंगाने भाजप आणि शिवसेना कामाला लागली आहे. पक्षश्रेष्ठी ते सांगतील तोच उमेदवार अहमदनगर दक्षिणमध्ये निवडून येईल असा विश्वास भाजपाला वाटत आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचंही नाव सध्या खासदारकीच्या रिंगणात जोरदार आहे. तसे संकेतही राष्ट्रवादीकडून वेळोवेळी देण्यात आले. शरद पवार यांच्या मर्जीतले समजले जाणारे नगर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी मात्र राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, तरीही राष्ट्रवादीकडून निलेश लंके यांचा दावा प्रबळ मानला जात आहे.
त्यातच उद्धव ठाकरे यांनीही अहमदनगर दक्षिण मध्ये लक्ष घालत सुजय विखे यांना घेरण्यासाठी रणनीती आखली आहे. तशी बैठकही मातोश्रीवर झाली असून त्यात कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या असून त्यांच्याकडून तगडा उमेदवार देण्यात येईल असेही संकेत दिले आहेत.
वाचा - मुंबई काँग्रेसला खिंडार; मुखमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का
यावर बोलताना अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे म्हणाले जर एखाद्या पक्षाचे अध्यक्ष माझं नाव घेऊन आणि ठरवून रणनीती करत असतील तर ते माझ्यासाठी चांगलेच आहे. याचा अर्थ मी केलेल्या कामाची राज्यात चर्चा होत असेल तर ते चांगलेच असल्याचे मत विखे यांनी व्यक्त केलं. तर दुसरीकडे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनेही दावा केला आहे. या जागेवर राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी अहमदनगर मधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे,
2024 च्या निवडणुकांमध्ये कोणत्या जागा कोणाला मिळणारा याकडे सर्वांचे लक्ष लागून असलं तरी सुजय विखे विरुद्ध निलेश लंके त्यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे जर काँग्रेसला अहमदनगरची जागा भेटली तर तिरंगी लढत नक्कीच होईल. त्यामुळे या निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.