आणखी दोन दिवस जोरदार पाऊस
नगर जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला. पुढील दोन दिवस जिल्ह्यात विजेच्या कडकटांसह वादळी वाऱ्याच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे. पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया गेला होता. पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, जवळपास दोन तास शहरात आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. अहमदनगर शहरांमधील गल्लीबोळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नागरिकांचे मोठी गैरसोय झालेली पाहयला मिळाली.
advertisement
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ pic.twitter.com/Um1IkvRbCJ
— News18Lokmat (@News18lokmat) September 23, 2023
गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेले पाऊस फक्त दिलासाच देणारा आहे. जिल्ह्यातील दुष्काळ हटण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची खरी गरज आहे. अद्यापही लहान-मोठी धरणे, पाझर तलावे, बंधारे कोरडीठाकच आहेत. विहिरींनीही तळ गाठलेलाच आहे म्हणूनच जिल्ह्यासह राज्यात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शुक्रवारी (दि.22) दमदार पाऊस झाला. दमदार पावसामुळे शेतकरी वर्ग बऱ्यापैकी सुखावला. गेल्या साडेतीन महिन्यांपासून पावसाने प्रचंड उघडिप दिली होती.
बऱ्याच कालावधीनंतर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ऐन गणेशोत्सवात पाऊस पडल्याने गणपती बाप्पा पावला, अशीच सकारात्मक प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे. हा पाऊस शेतातील पिकांसाठी संजीवनी ठरला आहे. मात्र, आणखी मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. गुरुवारी श्रीगोंद्यासह काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. श्रीगोंद्याच्या काही पट्ट्यात धो-धो पाऊस झाला. जोरदार पावसामुळे श्रीगोंद्यातील काही नद्यांना पूर आला. गुरुवारनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पावसाने सर्वत्र हजेरी लावली.