अजित पवारांच्या विमानाला घातपातच झाला, असा दावा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विमान ज्या पद्धतीनं कोसळलं तो घातपात किंवा आत्मघाती हल्ल्यासारखा प्रकार होता, ही चर्चा मागील आठवड्यापासून सुरू झालीय. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पिंकी माळीच्या वडिलांनीही कट आणि घातपाताचा संशय व्यक्त केलाय. अपघाताच्या दिवशी बदलण्यात आलेला पायलट आणि सकाळी 6 वाजता ट्रॅफिक जामचा मांडला जाणारा मुद्दा, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
advertisement
काय म्हणाले पिंकी माळीचे वडील?
रोहित पवार यांची कालची पत्रकार परिषद मी पाहिलेली आहे. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न रास्त आहेत. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर मिळायला हवीत. पिंकी आदल्या रात्री काही गोष्टी सांगायच्या आहेत असे म्हणाली होती पण त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ही घटना घडली असं म्हणत पिंकी माळीचे वडील शिवकुमार यांनी टाहो फोडला.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
विमान आणि पायलट बदलण्याचा तपास झाला पाहिजे, यावर शिवकुमार माळींनी भर दिलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज समोर आणण्याची मागणी मिटकरींनी केली आहे. पायलटला आमिष दाखवून घातपात घडवून आणला असावा, अशा शक्यताही मिटकरींनी वर्तवली आहे.
प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?
गोजूबावी गावच्या शिवारात झालेल्या विमान अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनीही चौकशीची मागणी केलीय. विमान कमी उंचीवरून उडत होतं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. विमानात तांत्रिक बिघाड झाला होता की वैमानिकाची चूक होती? असा प्रश्न प्रत्यक्षदर्शींनी उपस्थित केलाय.
विमानाला घातपात करण्यात आल्याचा संशय
अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे राज्यातील नागरिकांना धक्का बसलाय. अजित पवार उमदे नेते होते आणि भविष्यात त्यांच्यासमोर अजून मोठी राजकीय संधी येणार होती आणि त्यामुळेच अजित पवारांच्या विमानाला घातपात करण्यात आल्याचा संशय वर्तवला जातोय. परिणामी संपूर्ण चौकशी होऊन अहवाल येईपर्यंत व्यक्त होणारे संशय आणि केले जाणारे दावे थांबणार नाहीत, हे सुरू असलेल्या घडामोडींवरून स्पष्ट होतं.
