रायगडमध्ये महायुतीतील दोन मंत्र्यांमधील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून
शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. पण आता या वादावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. नुकतेच अजित पवार, उदय सामंत आणि गोगावले यांच्या बैठक झाली.
या बैठकीत अजित पवार काय म्हणाले ?
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद अधिक तीव्र होऊ नयेत, यासाठी खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. कोणतंही वक्तव्य, कृती किंवा सोशल मीडियावरील आरोप यामुळे वातावरण अधिक बिघडू नये, अशी सूचना त्यांनी केली. या बैठकीनंतर अजित पवारांनी मंत्री आदिती तटकरे यांच्याशीही स्वतंत्रपणे चर्चा केली.
अजित पवार- अदिती तटकरेंची बैठक
रायगडमधील राजकीय संघर्षामुळे महायुतीच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो, याची जाणीव ठेवून सर्वांनी जबाबदारीनं वागावं असा सल्ला अजित पवारांनी अदिती तटकरेंना दिल्याचं बोललं जातंय.
भरत गोगावले काय म्हणाले?
अजित पवारांच्या या भूमिकेवर शिवसेना मंत्री भरत गोगावले म्हणाले, मी बातमी पाहिली नाही. आम्हालाही काही हौस नाही वाद करायचा. दादांनी त्यांनाही सांगावं..व्हिडिओ वगैरे दाखवणे.बदनामी करणे योग्य नाही... दादा एक पाऊल पुढे गेले तर आम्ही दोन पावले पुढे जावू
महायुतीतील पक्षांमध्येच स्पर्धा
राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना अपेक्षित असताना, अनेक ठिकाणी महायुतीतील पक्षांमध्येच स्पर्धा निर्माण झालीय. रायगडमध्ये तर हा संघर्ष अधिकच टोकाला गेला आहे. आदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यास शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले,आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांचा विरोध आहे.
अजित पवार रायगडच्या मैदानात
हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर कॅश बॉम्बमुळे रायगडमधील शिवसेनेचे दोन्ही आमदार जास्तच चर्चेत आलेत. अंबादास दानवे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर कॅश बॉम्ब टाकला तर शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी महेंद्र दळवींवर टीका करताना भरत गोगावले यांनाही लक्ष्य केलं होतं. यामागे सुनील तटकरे असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी खुलेआम केला होता. त्यावरून गोगावले-थोरात-दळवी विरुद्ध सुनील तटकरे यांच्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. मात्र, हा संघर्ष थांबवण्यासाठी आता खुद्द अजित पवार रायगडच्या मैदानात उतरले आहेत.
आता थेट अजित पवारांनीच स्पष्ट संदेश दिल्यानंतर रायगडातील शिवसेना राष्ट्रवादीतील वाद संपण्याची चिन्हं आहेत. पण अजित पवारांची शिष्टाई कामी येणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल.
