अजित पवारांचा हा व्हिडी ओ त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधी तयार करण्यात आला होता. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अजितदादांनी हा संदेश रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करत, नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले होते.
advertisement
अजितदादा हे शेवटच्या क्षणापर्यंत जनतेशी जोडून राहिले, हे या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येते. राजकीय जबाबदाऱ्या, व्यस्त कार्यक्रम आणि निवडणुकीचा ताण असूनही त्यांनी लोकशाही मूल्यांवरचा आपला विश्वास अधोरेखित केला. जनतेशी थेट संवाद साधण्याची त्यांची शैली, स्पष्ट शब्दांत मांडलेले विचार आणि आत्मीयता या संदेशात प्रकर्षाने जाणवते.
राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेल्या अजितदादांनी कायम विकास, प्रशासन आणि लोकशाही यांना प्राधान्य दिले. मतदारांशी संवाद साधताना त्यांनी केवळ पक्षीय मुद्द्यांवर न थांबता, नागरिकांचे कर्तव्य आणि लोकशाहीची जबाबदारी यावर भर दिला.
नमस्कार मतदार बंधू भगिनींनो,
आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा विकास कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्याची ही महत्त्वाची वेळ आहे. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची खरी किल्ली आहे. पाणी, रस्ते, वीज, शेती, रोजगार या सारख्या मुलभूत प्रश्नांशी जोडलेली ही संस्था आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायम ग्रामीण भागाला केंद्रस्थानी छेवत काम केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून, महिलांचे सक्षमीकरण, तरुणांच्या रोजगार, ज्येष्ठांच्या सन्मानापर्यंत आम्ही विकासाचा मुद्दा आम्ही गांभीर्याने हातळला आहे. मी केवळ शब्दाचा पक्का नाही तर कामाचा माणूस आहे. दिलेला शब्द पाळणे ही माझी ओळख आहे. पाणीपुरवठा, रस्त्त्याचे काम, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान हे सर्व ग्रामीण भागापर्यंत पोहचवण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना या निवडणुकीत साथ द्या, स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यक्रमासाठी आम्हाला संधी द्या... तुमच्या विकासाला कधी तडा जाऊ देणार नाही... विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. विकासकामांच्या या प्रवासात आमच्यासोबत सहभागी व्हा... येत्या निवडणुकीत तुम्ही घड्याळासमोरील बटण दाबत मतरुपी आशीर्वाद आम्हाला द्या असे मी आवाहन करतो. तुमचे मत गावाच्या समृद्धीसाठी हे ही लक्षात ठेवा...
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी....
अजितदादांच्या अकाली जाण्याने राज्याने एक अनुभवी, लोकाभिमुख आणि ठाम नेतृत्व गमावले आहे. मात्र, त्यांच्या विचारांची आणि कार्याची आठवण या व्हिडिओच्या माध्यमातून कायम राहणार आहे. लोकशाहीवरचा त्यांचा दृढ विश्वास आणि जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न हीच त्यांच्या राजकीय कारकीर्दीची खरी ओळख ठरेल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
