बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्ज दाख करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिवंगत अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्वच नेत्यांनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन केलं.
advertisement
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात चांगल्याच भावुक झाल्याचे दिसले. "अजितदादा हे बारामतीचा श्वास होते आणि त्यांचा अखेरचा श्वासही याच बारामतीच्या मातीत विसावला. आज संपूर्ण बारामतीत त्यांचा स्पर्श जाणवतोय, इथली न बोलणारी पानं-फुलंही दादांच्या आठवणीत रडत आहेत," अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांच्या निधनानंतर लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात सुनेत्रा पवार यांनी आज बारामतीकरांशी अत्यंत भावूक संवाद साधला. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.
सभेला संबोधित करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की ही पोटनिवडणूक अशा परिस्थितीत होईल. दादा आपल्यात नाहीत, हे मला आजही वाटत नाही आणि हे मला कधीच मान्य होणार नाही. पण नियतीने हा कठीण काळ आपल्या सर्वांवर आणला आहे. दादांचे जाणं ही केवळ एका कुटुंबाची हानी नसून संपूर्ण बारामतीची हानी आहे."
"अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांचा विकासाचा वारसा मी पुढे नेईन. बारामतीचा विकास कधीही थांबणार नाही आणि इथल्या प्रशासनावरील वचक तसाच राहील. गुंडागर्दी किंवा खंडणीखोरीला बारामतीत अजिबात थारा मिळणार नाही, याची मी खात्री देते," अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.
सुनेत्रा पवारांनी पुढे म्हटले की, मला महायुतीचा भक्कम पाठिंबा आहे. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची (शरद पवार) सून आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या दादांची पत्नी म्हणून हे राज्य सांभाळण्याची ताकद मला नक्कीच मिळेल. केवळ जय आणि पार्थ हेच माझं कुटुंब नाही, तर संपूर्ण बारामती हे माझं कुटुंब आहे. तुमच्यापैकी एकालाही मी वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचे विचार आणि कामाची पद्धत कायम ठेवत बारामतीची ओळख जपण्यासाठी मी कटिबद्ध आहे."
बारामतीकरांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा
अजितदादांच्या कार्यपद्धतीची आठवण करून देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, "बारामतीकरांची सेवा करणे म्हणजेच विठ्ठल-पांडुरंगाची सेवा करणे, हाच दादांचा आयुष्यभराचा विश्वास आणि आधार होता. त्यांनी प्रत्येक कामात बारामतीला केंद्रस्थानी ठेवलं. आज ते शारीरिकदृष्ट्या आपल्यात नसले, तरी इथल्या प्रत्येक विकासकामात त्यांचा स्पर्श आहे."
