याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं एक विधान. अजित पवारांसोबत नक्की काय घडलं? अपघात कसा झाला? याबद्दल आम्ही ९ फेब्रुवारीनंतर बोलू, अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. यामुळे पवार कुटुंबीयांकडे काही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे का? असा सवाल विचारला जात आहे. काल बारामतीत पवार कुटुंबीयांची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवारांसह पवार कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
advertisement
या बैठकीनंतर रोहित पवारांनी अपघातावर मोठं भाष्य केलं. नऊ तारखेनंतर मी त्यावर बोलेल. विमानात काय घडलं? काय नाही? याबाबत सर्व माहिती जनतेसमोर आली पाहिजे. काही अनुत्तरित प्रश्न आहेत, ते आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकार आणि विमान कंपन्यांना विचारू. काही शंका आहेत तेही त्याबद्दलही विचारू, असंही रोहित पवार म्हणाले.
बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या बैठकीबद्दल माहिती देताना रोहित पवारांनी सांगितलं की, शरद पवार साहेब नेहमीच कुटुंबाचे केंद्रबिंदू राहिलेले आहेत. परिवाराला जेव्हा अडचणी आल्या, तेव्हा पवार साहेब हे उभा राहिले आहेत. दादा नसताना पवार साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे. व्यक्तिगत आणि परिवारातली विषय असतील हे विषय व्यक्तिगत सामाजिक आहेत. अजितदादांचं चांगलं स्मारक व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे त्याची पाहणी आम्ही आज केली आहे. एक चांगलं म्युझियम दादांचं व्हावं ते बारामती शहरात असावं की कुठे असावं? याबाबत काही दिवसात पवार कुटुंब निर्णय घेईल.
विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारला असता रोहित पवार पुढे म्हणाले, खरंतर काही दिवसांपासून परिवारात राजकीय चर्चा झालेली नाही. नऊ तारखे नंतर मी स्पष्टपणे बोलेल. दादांची इच्छा काय होती? युती होईल, विलीनीकरण होईल की नाही? यावर भाष्य करण्याएवढा मी मोठा नाही. सध्या महाराष्ट्रात जी चर्चा सुरू आहे, ती ऐकून दुःख वाटतं. चर्चा दुसरीकडे भरकटच चालली आहे, त्याला राजकीय स्वरूप दिलं गेलं आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
