नेमकं प्रकरण काय आहे?
बीडच्या रायमोहा परिसरातील डोंगरदेवी दगडवाडी शिवारात ३० वर्षीय चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असता, ही हत्या मयत चांदचा मित्र अतिक तांबोळी याने केल्याची माहिती समोर आली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत चांद ऊर्फ गुड्डू याने आरोपी अतिकला दीड लाख रुपये उसणे दिले होते. हे पैसे परत मिळावे, यासाठी चांदने अतिककडे पैशांची मागणी लावून धरली होती. तो सतत या पैशांचा तगादा लावत होता. पण अतिक पैसे देत नव्हता. सोमवारी आरोपी अतिक याचं लग्न होणार होतं. "जर तू माझे पैसे दिले नाहीत, तर मी तुझ्या लग्नात येऊन मोठा गोंधळ घालेन," अशी धमकी चांदने अतिकला दिली होती.
लग्नाच्या आदल्या रात्रीच काढला काटा
आपली लग्नात बदनामी होईल आणि गोंधळ उडेल या भीतीने अतिक प्रचंड धास्तावला होता. याच रागातून त्याने रविवारी रात्री चांदला डोंगरदेवी दगडवाडी शिवारात गाठले. तिथे त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी संतापलेल्या अतिकने दगडाने ठेचून चांदची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर अतिक फरार झाला होता, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मध्यरात्री बीड शहरातून त्याला अटक केली.
लग्नाला अवघे काही तास बाकी असताना अशाप्रकारे नवरदेवाला अटक झाल्याने पाहुण्यांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी अतिकला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास केला जात आहे.
