मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधून सुमारे 14 कुटुंबे माजलगाव तालुक्यातील एका गावात ऊसतोडणीच्या कामासाठी वास्तव्यास आली होती. 24 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास मुलींचे वडील व इतर नातेवाईक शेतात कामासाठी गेले असताना दोन अल्पवयीन मुली आपल्या झोपडीत एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत गावातीलच एका किराणा दुकानदारासह त्याच्या ट्रॅक्टर चालक मित्राने तिथे येत मुलींना फसवून बाहेर नेले.
advertisement
लग्नाचं आश्वासन दिलं, गोळ्या खाल्ल्या अन् महिलेसोबत..., पोलिसाचं भयानक कांड, बीड हादरलं!
आरोपींनी जबरदस्तीने दोन्ही मुलींना वेगवेगळ्या शेतांमध्ये ओढत नेले. एकीवर उसाच्या शेतात तर दुसरीवर कपाशीच्या शेतात अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपींनी मुलींना जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्या भयभीत झाल्या. त्यामुळे हा प्रकार तात्काळ उघडकीस आला नाही.
चार दिवसांनंतर, 28 डिसेंबर रोजी एका पीडित मुलीने धैर्य एकवटून आपल्यासोबत घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर दुसऱ्या मुलीनेही नातेवाइकांकडे आपबीती कथन केली. यानंतर ऊसतोड मजुरांनी थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. फिर्यादीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली.
दरम्यान, दोन्ही पीडितांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीने पालकांशी संवाद साधत पीडितांचे समुपदेशन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कायदेशीर मदत, मानसिक आधार व शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या घटनेमुळे स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.






