Success Story : अवकाळी पावसाने नुकसान झालं पण हार नाही मानली, केली टरबूज शेती, 8 लाखांचा झाला नफा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे ही दोन्ही पिके पूर्णपणे पाण्याखाली जाऊन नष्ट झाली. या नुकसानीमुळे त्याच्यावर मोठा आर्थिक ताण आला आणि काही काळ तो निराश झाला.
बीड : बीड जिल्ह्यातील ज्ञानेश्वर चव्हाण या तरुण शेतकऱ्याने कठीण परिस्थितीवर मात करत शेतीतून उल्लेखनीय यश मिळवले आहे. फक्त दोन एकर जमिनीवर शेती करणाऱ्या ज्ञानेश्वरने यंदाच्या हंगामात दीड एकरात कापूस आणि उर्वरित अर्ध्या एकरात सोयाबीन पिकवले होते. मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे ही दोन्ही पिके पूर्णपणे पाण्याखाली जाऊन नष्ट झाली. या नुकसानीमुळे त्याच्यावर मोठा आर्थिक ताण आला आणि काही काळ तो निराश झाला.
पिकांचे नुकसान झाल्यानंतर पुढे काय करायचे, हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. तरीही खचून न जाता त्याने नव्याने उभे राहण्याचा निर्णय घेतला. हिवाळी हंगामात टरबूजाची लागवड करता येते, याची माहिती असल्यामुळे त्याने या पिकाचा पर्याय निवडला. मागील वर्षी टरबूज लागवडीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नव्हते, तरीदेखील अनुभवाच्या जोरावर यंदा पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी त्याने दाखवली.
advertisement
ज्ञानेश्वरच्या या निर्णयावर अनेकांनी शंका घेतली. पुन्हा नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त करत काहींनी त्याला सावध राहण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने कोणाच्याही नकारात्मक बोलण्याला न जुमानता सावकाराकडून सुमारे दीड लाख रुपये उसने घेतले. टरबूज लागवडीसाठी त्याला सुमारे एक लाख दहा हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागली. नियोजनबद्ध पद्धतीने पाणी, खत व्यवस्थापन आणि पिकाची निगा राखत त्याने मेहनत सुरू ठेवली.
advertisement
कष्ट आणि चिकाटीचे फळ त्याला यावेळी भरभरून मिळाले. टरबूज पिकाला चांगली वाढ मिळाल्याने उत्पादनही समाधानकारक झाले. बाजारपेठेत टरबूजाला चांगला दर मिळाल्यामुळे त्याच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. एका हंगामातच त्याने सात ते आठ लाख रुपयांचा नफा मिळवत कर्जाची परतफेड केली आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त होण्याची दिशा मिळवली.
संकटं येतातच, पण त्यांना घाबरून न जाता धैर्याने पुढे जाणे गरजेचे आहे,असे ज्ञानेश्वर चव्हाण सांगतात. त्यांच्या या यशस्वी प्रवासामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही नव्या पिकांचा विचार करण्याची प्रेरणा मिळत आहे. कमी क्षेत्रातही योग्य नियोजन, जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळू शकते, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 2:58 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : अवकाळी पावसाने नुकसान झालं पण हार नाही मानली, केली टरबूज शेती, 8 लाखांचा झाला नफा







