विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जागा कमी पडल्या तर तुम्ही उद्धव ठाकरे की शरद पवार यापैकी कोणासाठी दरवाजे उघडणार? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, कुणाची गरज लागणार नाही. निकालाची वाट बघा, आम्ही तिघेच पुरेसे आहोत आणि तशी परिस्थितीच येणार नाही.
advertisement
मुख्यमंत्री शिंदे हाच आमचा चेहरा
महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. याबद्दल विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला आम्ही निकालानंतर ठरवू. आम्ही सरकार म्हणून निवडणुकीला सामोरं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाच आमचा चेहरा आहेत. मुख्यमंत्रीपदाबद्दल आम्ही ठरवलंय. जो निर्णय होईल तो निकालानंतरच. तसंच मुख्यमंत्री शिंदे यांनी रोटेशनल मुख्यमंत्री अशी अट ठेवली नसल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.
हिुंदुत्वावरून ठाकरेंवर टीकास्र
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीकाही केली. ते म्हणाले की, आमच्या हिंदुत्वाबद्दल बोलण्याची गरज नाही. बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व ठाकरेंनी कधीच हरवलं. आदित्यना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, कारण त्यांना शिकवायला अबू आझमी आहेत. बाळासाहेबांना जनाब म्हटलं जातं, बाळासाहेबांचं हिंदुत्व जे होतं, शिवसेनेचं जे हिंदुत्व होतं ते उद्धव ठाकरेंनी संपवलं. मला ना ठाकरे संपवू शकतात, ना मी त्यांना संपवू शकतो. कोणाला संपवायंच हे जनताच ठरवते.
