अकोल्यात पुन्हा एकदा भाजपने सत्ता राखली आहे. शहर सुधार आघाडीकडून भाजपने आपली सत्ता आणली आहे. भाजपच्या शारदा खेडकर या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. तर उपमहापौरपदी भाजपचे अमोल गोगे यांची निवड झाली आहे. 80 नगरसेवक संख्या असलेल्या अकोल्यात महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप हा 38 जागा जिंकून एक नंबरचा पक्ष ठरला होता. मात्र बहुमताचा आकडा भाजपला गाठता आला नाही. त्यामुळे भाजपने खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षासह अजित पवार यांचा १, शिंदे सेना, महानगर विकास आघाडीसह एका अपक्षाला सोबत घेत एकूण 45 सदस्यांसह सत्तेचं गणित जुळवलं.
advertisement
भाजपने दिला वंचित काँग्रेसला शह
निकालानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापनेसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली होती. काँग्रेसकडून वंचित आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीने सत्ता स्थापनेचा दावा केला जात होता. मोठ्या प्रमाणात बैठका घेतल्या जात होत्या. मात्र, भाजपने राजकीय खेळी खेळत काँग्रेससह वंचितला शह दिला आणि महापालिकेत आपली सत्ता राखली आहे.
एमआयएम तटस्थ
तर एमआयएमच्या तीन सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने ही निवडणूक 77 पैकी 45 विरुद्ध 32 असा सामना भाजपने जिंकला आहे. अकोला महापौरपदी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या शारदा खेडकर 45 मते घेऊन विजयी झाल्या आहे. तर ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा 13 मतांनी केला पराभव झाला. काळे यांना 32 मतं मिळाली. तर एमआयएमच्या 3 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे.
अशी बनली सत्ता - भाजप पक्षीय बलाबल
भाजप - 38
राष्ट्रवादी (श प) - 03
राष्ट्रवादी (अ प) - 01
शिवसेना - 01
अपक्ष - 02
संपूर्ण पक्षीय बलाबल - एकूण 80 जागा
भाजप - 38
राष्ट्रवादी (श प) - 03
राष्ट्रवादी (अ प) - 01
शिवसेना - 01
अपक्ष - 02
काँग्रेस - 21
उबाठा - 06
वंचित - 05
एमआयएम - 03
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भाजपला पाठिंबा दिला आणि एमआयएम तटस्थ असल्याने, काँग्रेस नगरसेवक सभागृहात संतप्त झाले होते. शरद पवार गटाचा पाठिंबा आणि एमआयएम तटस्थ असल्यानं त्यांच्यावर खरेदी विक्री झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने सत्ता स्थापनेचा जादुई आकडा गाठण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केले होते. मात्र, भाजपने बाजी मारली, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, उबाठा, एमआयएम आणि अपक्षांच्या यासंदसर्भात बैठका पार पडल्या. परंतु त्यांच्या पथ्यात काहीच पडलं नाही. काँग्रेस २१ जागा, ठाकरे गट ०६ , वंचित ५, एमआयएम ३ जागा आणि अपक्ष २ जागा असं मिळून समीकरण बनवलं होतं. काँग्रेसने एकूण ३७ जागांचा समीकरण जुळवलं होतं. पण, एमआयएमने तटस्थ राहिल्यामुळे काँग्रेसची खेळी वाया गेली.
MIM च्या नगरसेवकांच्या अंगावर फेकल्या बांगड्या
दरम्यान, सभागृहात विरोधी पक्षाने संतप्त होतं एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्याही फेकल्याचा आरोप केला जात आहे. एमआयएमच्या तटस्थ भूमिकेमुळे आघाडीचे गणित बिघडल्यामुळे सभागृहात काहीकाळ तणाव झाला होता. दरम्यान, एमआयएम तटस्थ राहिल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. 'शक्तीमानही गंगाधर है और गंगाधरही शक्तीमान' तसंच भाजप आणि एमआयएम एक आहे. एकीकडे हिंदुत्ववादी भूमिका आणि दुसरीकडे एमआयएम सोबत सत्ता हे दुटप्पी भूमिका आहे. अजित पवारांच्या निधनानंतर किमान चिता शांत होण्याची वाट पहायला हवी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर केलेले आरोप मागे घेऊन माफी मागितली पाहिजे, असा आरोप अतुल लोंढे यांनी केली आहे.
