गेल्या अनेक दिवसांपासून युती आघाड्यांसाठी पक्षनेत्यांची बोलणी सुरू होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तासालाही एबी फॉर्म वाटपाचे काम पक्षीय स्तरावर सुरू होते. पक्षात अधिक बंडखोरी होऊ नये, यासाठी सगळ्याच पक्षांनी एबी फॉर्म देण्यासाठी मुद्दामच विलंब केला. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली होती. अखेर एबी फॉर्म मिळाल्यानंतर उमेदवारांनी तातडीने कार्यालय गाठून उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे कोण किती जागांवर लढणार, हे चित्र स्पष्ट झाले.
advertisement
ठाकरे बंधूंनी जागा वाटपाचं अवघड गणित सोडवलं
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार हे काही महिन्यांपूर्वीच ठरले होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगोलग दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जागा वाटपासाठी बैठका सुरू केल्या. सुरुवातीला काँग्रेस पक्षही सोबतीला हवा, असा आग्रह ठाकरे गटाने धरला. परंतु काँग्रेसने वंचितसोबत युती केल्यानंतर ठाकरे गटाने मनसे आणि राष्ट्रवादीसोबत जागावाटपाचे सूत्र ठरवले. त्यानुसार शिवसेना ठाकरे गट १६३ जागा, मनसे ५३ जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ११ जागांवर लढत आहे.
उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष मुंबईत जवळपास ६० हून अधिक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांशी लढत आहे. दोन्ही शिवसेनेच्या संघर्षात अधिक फटका बसू नये यासाठी ठाकरे जागा वाटपात शिंदेंपेक्षा दुप्पट जागा लढवत आहेत. काँग्रेस स्वबळावर लढत असल्याने मतविभागणीत कोणत्या पक्षाला कसा फायदा होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे अधिक जागांवर लढून अधिक ठिकाणी विजयी होण्याचे पर्यायाने पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे.
मुंबईत भाजप आणि शिवसेना महायुतीचे जागावाटप पूर्ण झाले असून भाजप १३७जागा तर शिवसेना ९० जागांवर लढत आहे. महायुतीचे इतर घटकपक्ष यात समाविष्ट असतील. आपापल्या कोट्यातून मित्रपक्षांना उमेदवारी देण्यात यावी, असे गणित ठरले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या 'खऱ्या शिवसेनेला' ९० जागा
आमचीच शिवसेना खरी, आमची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची, असे दावे एकनाथ शिंदे करतात. विधानसभा आणि लोकसभेत ताकद दाखवल्यानंतर मुंबईतही शक्ती दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना मुंबईत अनेक धक्के दिले. ७० च्या आसपास माजी नगरसेवकांना पक्षात खेचले. मात्र जागा वाटपात यशस्वी शिष्टाई करण्यात शिंदेसेनेचे नेते कमी पडल्याची चर्चा आहे. कारण ज्या शिवसेनेचा मुंबईत जन्म झाला, वाढली विस्तारली, शिवसेना झेपावली तिथेच शिवसेना भाजपपेक्षा कमी जागांवर लढणार आहे. विशेष म्हणजे इतिहासात सर्वाधिक वेळा शिवसेनेचा महापौर मुंबईत बसले.
