मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचितची युती झाली. वंचितच्या ६३ जागांपैकी १६ जागांवर त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने त्यांनी जा जागा काँग्रेसला देऊ केल्या. परंतु अर्ज भरायला काही तास शिल्लक असताना वंचितचा निरोप आल्याने काँग्रेसलाही उमेदवार उभे करणे जमले नाही.
मुंबई काँग्रेसने १४६ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडी ४६ तर डावे पक्ष आणि महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष यासारख्या मित्रपक्षांना सहा जागा देण्यात आल्या आहेत. म्हणजेच काँग्रेस आणि वंचित आघाडी १९५ जागांवर लढत असल्याने उर्वरित ३२ जागांवर आघाडीचा उमेदवारच नसणार आहे.
advertisement
ठाकरे बंधूंना मतविभाजन टळल्याचा फायदा होणार
काँग्रेस आणि वंचित आघाडीचे ३२ जागांवर उमेदवार नसल्याने भाजपविरोधी मतांचे विभाजन होण्याची शक्यता अगदी कमी आहे. मतविभाजन टळल्याचा थेट फायदा ठाकरे बंधूंना होणार आहे.
दलित मुस्लिम मते ही काँग्रेस वंचितची मतपेटी मानली जाते. या ३२ प्रभागात आघाडीचा उमेदवारच नसल्याने ही मते भाजपविरोधात ठाकरे बंधूंकडे वळतील, असे म्हटले जाते. दुसरीकडे या प्रभागांत भाजप सेना युतीचा उमेदवार विरुद्ध ठाकरे बंधूंच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.
काही प्रभागांत उमेदवार सक्षम नसल्याने तर काही प्रभागात इच्छुक उमेदवारांच्या कागदपत्रे गोळा करण्यात अडचणी आल्याने अर्ज भरण्यासही अडचणी आल्या. याच जागा वंचितने काँग्रेसला देऊ केल्या. मात्र ऐनवेळी तुल्यबळ उमेदवारांची शोधाशोध करणे काँग्रेसलाही जमले नाही.
