नेमकं काय घडलं?
मुलगा छतावर होता. आजूबाजूचे लोक जमले, आरडाओरडा सुरू झाला. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली. अरमान खान हा मुलगा आपल्या इतर मित्रांसोबत दुपारच्या वेळी क्रिकेट खेळण्यात दंग होता. मुलांचा आरडाओरडा, चौकार-षटकार मारण्यात मुलं रमले होते. सगळं कसं आनंदी वातावरण होतं. खेळता खेळता बॉल जवळच असलेल्या एका दुकानाच्या लोखंडी पत्र्याच्या छतावर गेला.
advertisement
बॉल परत आणण्यासाठी कसरती सुरू झाल्या.. अरमान उत्साहाने त्या पत्र्यावर चढला. पण तिथेच काळ दबा धरून बसला होता. पत्राच्या छतावरून विजेच्या हायव्होल्टेज तारा गेल्या होत्या. चेंडू उचलण्याच्या घाईत अरमाणचा हात त्या उघड्या तारेला लागला आणि एका भीषण स्फोटासारखा आवाज झाला. लोखंडी पत्रा आणि विजेचा प्रवाह यामुळे अरमानला इतका जोरदार झटका बसला की तो तिथेच कोळसा झाला.
परिसरात एकच खळबळ
अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रसंग पाहून सोबत खेळणाऱ्या मुलांची बोबडीच वळाली. मुलांनी आरडाओरडा केला. धक्का बसताच अरमान गंभीररीत्या भाजला गेला. अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून त्याला बाहेर काढण्यात आले. भाजलेल्या अवस्थेतील अरमानला नांदेडच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. घरी सुखरूप परत येईल असं वाटणारा आपला मुलगा थेट रुग्णालयात, तेही अशा अवस्थेत असल्याचं समजताच अरमाणच्या कुटुंबावर आभाळ कोसळलं.
सध्या अरमानवर नांदेडच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. लहान मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. एक छोटी चूक त्यांच्या जीवावर बेतू शकते.
