धक्कादायक बाब म्हणजे ज्या तरुणीचं हल्लेखोरांनी अपहरण केलं. तिचं नुकतंच लग्न ठरलं होतं. रविवारी १३ जुलै रोजी तिचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून हे कुटुंब पुन्हा आपल्या गावी परत चाललं होतं. पण वाटेत असणाऱ्या वेरुळ घाटातील चांगोबाच्या वळणाजवळ तीन अज्ञातांनी या कुटुंबीयांची कार अडवली आणि कुटुंबावर हल्ला करत नियोजित वधूचं अपहरण केलं.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मोहाडी उपनगरातील एक कुटुंब आपल्या मुलाच्या साखरपुड्यासाठी रविवारी छत्रपती संभाजीनगरातील सिडको परिसरात गेले होते. दुपारी साखरपुडा पार पडल्यावर विवाह ठरवलेल्या वधूसह हे कुटुंब रात्री उशिरा आपल्या घरी परतत होते. दरम्यान, रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास वेरूळ घाटातील चांगोबाच्या वळणाजवळ अज्ञात तिघांनी त्यांच्या वाहनास (एमएच १८ बीआर २५१८) अडवून तलवार व कोयत्यांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी वाहनाच्या काचा फोडून चारवर्षीय पीयूष पाटील याला गंभीर जखमी केले. तर चालक कैलास श्रीकृष्ण शिंदे (रा. मोहाडी) देखील जखमी झाला. या वाहनात चार महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुले होती. हल्लेखोरांनी नियोजित वधूला जबरदस्तीने गाडीत बसवून नेले.
या घटनेनंतर संबंधित वाहन खुलताबाद पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आले असून अद्याप याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. हल्लेखोरांचा उद्देश काय होता? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, जुनी दुश्मनी की आणखी काही कारण यामागे आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र एका तरुणीचं अशाप्रकारे घाटातून अपहरण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.