संघमित्राची राजकारणात एन्ट्री कशी झाली?
संघमित्रा चौधरी ही अवघ्या २२ वर्षांची मुलगी. वकिलीचे शिक्षण घेऊन वंचित वर्गातल्या लोकांसाठी लढणं हे तिचं ध्येय परंतु भारत आणि इंडिया हा भेदभाव जसा गेली अनेक वर्ष होतो आहे तसेच बारामतीतही आपल्या लोकांसोबत घडते आहे हे जाणवल्याने संघमित्रा राजकारणाच्या आखाड्यात उतरली. फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून काळुराम चौधरी गेल्या तीन दशकापासून काम करीत आहेत, त्यामुळे संघमित्राला राजकारणात उतरणे जड गेले नाही.
advertisement
बारामतीच्या आमराई परिसरातून प्रभाग क्रमांक १४ मधून संघमित्रा निवडणुकीला सामोरे गेली. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात तिने दोन हात केले. प्रस्थापित राजकारण्यांसमोर लढणे हे तसे अवघड काम, परंतु वंचित वर्गातल्या लोकांना या लढाईचे महत्त्व सांगून तुमच्यासाठी नेमकं काय करणार आहे, हे संघमित्राने पटवून दिले. विशेषतः इथल्या झोपडपट्टीचा प्रश्न किती कळीचा आणि महत्त्वाचा आहे हे संघमित्राने लोकांच्या मनावर ठसवले. त्यामुळे तिला मतदार राजाची मोलाची साथ मिळाली.
दोन बारामती बघायला मिळतात, एक अतिशय स्वच्छ सुंदर आणि दुसरी वंचित वर्गाच्या हाल अपेष्टांची
बारामतीत आमराई परिसर अनेकांनी बदनाम केलेला आहे. आमराईबद्दल काही लोक सातत्याने वाईट गोष्टी बोलत राहतात. आधीच्या काळात जसा वंचित वर्गाला भेदभावाचा सामना करावा लागला. तसाच सामना आजही इथल्या लोकांना करावा लागतो. बँक असो की पोलीस स्टेशन, आमच्या लोकांविरोधात एक व्यवस्था काम करते. बँकेत लोन मिळत नाही तर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस भेदभावाची वागणूक देतात. आमच्या लोकांवर गुन्हेगारीचा शिक्का आहे. कारण आमच्या समाजात शिकलेल्यांचा टक्का कमी आहे. हा टक्का मला वाढवायचा आहे. माझ्या प्रभागात सीबीएसई पॅटर्न सुरू करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या प्रभागात गटार आणि पाण्याचा प्रश्नही मोठा आहे. तो प्रश्न प्राधान्य क्रमाने सोडविण्याचा माझा प्रयत्न असेल असे संघमित्राने सांगितले.
संघमित्राचे प्राथमिक शिक्षण बारामतीतील शाळेत तर उच्च शिक्षण पुण्यातील नौरोसजी वाडिया महाविद्यालयात झाले. पुण्यातील भारती विद्यापीठात ती कायद्याचे शिक्षण घेत आहे. कायद्याच्या माध्यमातून वंचित वर्गासाठी काम करण्याची इच्छा असली तरी थेट आपल्या लोकांसाठी भरीव काम करायचे असेल तर त्यांचे प्रतिनिधित्व करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे ओळखून बारामती नगर परिषदेची निवडणूक लढविल्याचे संघमित्रा सांगते. वडील काळुराम चौधरी यांचे चळवळीत गेल्या अनेक दशकांपासून काम असल्याने मला निवडणूक लढविणे अवघड गेले नाही. समोर प्रस्थापित पक्षांचे उमेदवार असले तरीही मी कुणासाठी काम करते आहे हे लोकांना पटवून दिल्याने त्यांचा विश्वास मला मिळाला, असे संघमित्राने सांगितले.
पवारांच्या बारामतीत बसपाचा उमेदवार निवडून येणे याला वेगळे महत्त्व
बारामतीत बहुजन समाज पक्षाचा उमेदवार निवडून येणे याला वेगळे महत्त्व आहे, असेही संघमित्रा आवर्जून सांगते. कारण गेली अनेक दशके बारामती शहरावर पवार कुटुंबाचे वर्चस्व आहे. बसता उठता फुले-शाहू- आंबेडकरांचे नाव घेणारे पवार कुटुंब आमराई परिसरात मात्र अजिबात लक्ष देत नाही. इथल्या लोकांच्या विकासाचे त्यांना काहीही पडलेले नाही. संपूर्ण बारामती शहर एका बाजूला आणि आमराई परिसर एका बाजूला असे इथले धगधगते वास्तव आहे. हे वास्तव बदलण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे, असे संघमित्राने सांगितले.
झोपडपट्टीमुक्त प्रभाग करून इथल्या लोकांना चांगली घरं देण्याचा प्रयत्न
प्रभागातील लोकांच्या घरांचा मोठा प्रश्न आहे. बहुजन समाज पक्षाच्या जाहीरनाम्यात झोपडपट्टीमुक्त प्रभाग असे आश्वासन दिल्याने हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेल, असेही संघमित्राने आवर्जून सांगितले.
अजित पवार यांनी निधी दिला नाही तर...?
अजितदादांचे नाव घेतल्यावर निधीचा विषय येणार नाही, असे अजिबात होत नाही. तू निवडणूक राष्ट्रवादी विरोधात लढलीस. आता जर अजित पवार यांनी निधी दिला नाही तर काय? असे विचारले असता, माझे वडील नेहमी सांगतात अजित पवार माझे जेष्ठ बंधू आहेत. त्यामुळे काका मला निधी देणार नाही असे तर होणार नाही, असे संघमित्राने मिश्किलपणे सांगितले.
