काय आहे नेमकं प्रकरण?
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गमध्ये जाऊन केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. ही टीका राणे यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी गुहागर मतदार संघामध्ये जाहीर सभा आयोजित केली होती . मात्र, या सभेआधीच गुहागरमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
जाहीर सभेआधी माजी खासदार निलेश राणे यांची चिपळूणमधून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान हा रडा झाला. रॅलीदरम्यान निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमनेसामने आले. दोन्ही कार्यकर्त्याकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. जमावर नियंत्रण मिळवताना पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली. आता या प्रकरणात पोलिसांनी तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
भास्कर जाधवांनी काय टीका केली होती?
रत्नागिरीत झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. नारायण राणे पदांसाठी भीक मागत फिरणार असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला होता. या टीकेनंतर नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलंय. भास्कर जाधव यांनी जर पुन्हा विधान केलं तर चोप देणार, सोडणार नाही, असा इशाराच नारायण राणे यांनी दिला. ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली होती.
