मतदानाच्या टक्केवारीवरून काय सांगते गणित
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान झाले. मतदान केंद्रांवरील आकडे शिवसेना, एमआयएम आणि ठाकरेसेनेत काँटे की टक्कर होईल, असे सांगत आहेत. सहा मतदारसंघांत 700 मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान गेमचेंजर ठरणार असून बहुतांश बूथवर 80 टक्क्यांच्या पुढे मतदान झाल्याचे दिसते. शहरी भागातील पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवर 80 ते 90 टक्क्यांच्या आसपास झालेले मतदान एमआयएमच्या आशा पल्लवीत करत आहेत. तर त्या तुलनेत हिंदूबहुल भागातील केंद्रांवरही 80 टक्क्यांच्या पुढे मतदान झालेल्या केंद्रांचा आकडा मोठा असल्यामुळे महायुती विजयाचे गणित मांडत आहे. हिंदू वसाहतींमध्ये वाढलेल्या मतदानामुळे ठाकरे गटाला मोठी अपेक्षा आहे. तर वंचित बहुजन आघाडीसह अपक्षांच्या पारड्यात किती मते गेली, याची आकडे-मोड राजकीय पक्ष करत आहेत.
advertisement
इथे पाहा लेटेस्ट Maharashtra Loksabha Exit Poll 2024 Live Updates in Marathi
प्रचाराचे मुद्दे आणि आतापर्यंत शहरात झालेले राजकारण
आतापर्यंत शहराचे राजकारण बघता या अगोदर प्रत्येक निवडणुकीत खाण की बाण हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. मात्र यावेळेस शिवसेनेमध्ये झालेली फूट आणि उद्धव ठाकरे यांना मुस्लिमांचा मिळणारा पाठिंबा यामुळे चंद्रकांत खैरे यांना खान की बाण असा प्रचार करता आला नाही. मुस्लिम मते आपल्याला मिळावी म्हणून शिंदे गटाने देखील मुस्लिमांबद्दल तितकी धार या निवडणुकीत दाखवली नाही. तर दुसरीकडे हिंदू मतांसाठी इम्तियाज जलील यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपला उमेदवारी अर्ज भरला. म्हणजेच कधी नव्हे ती छत्रपती संभाजीनगरची निवडणूक ही जातीपाती पेक्षा वेगळ्याच मुद्द्यावर लढवल्या गेली. शहरातला पाणी प्रश्न या तीनही उमेदवारांचा प्रमुख मुद्दा होता. पाणी योजना आपण किती लवकर आणू आणि शहराला मुबलक पाणी देऊ हे उमेदवार सांगत होते.
असं सर्व असताना देखील शिंदे गटाने चंद्रकांत खैरे यांचा मुस्लिमांबद्दल वक्तव्य करतानाचा व्हिडिओ वापरून हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व आणि चंद्रकांत खैरे यांची बदललेली भूमिका तसेच चंद्रकांत खैरे भोंदू आणि अंधविश्वास पसरवणारे असल्याची शिंदे गटाकडून टीका झाली. इम्तियाज जलील यांच्यावर महायुतीने रझाकारांची अवलाद अशी तिखट टीका केली. दुसरीकडे चंद्रकांत खैरे यांनी आम्हाला बाळासाहेबांचे हिंदुत्व प्रिय असून जो देशाचा विचार करतो तो आमच्यासाठी हिंदू असे उत्तर देत आम्ही सर्वांचा विचार करून सर्वांगीण विकास करू हा मुद्दा रेटून धरला. तर संदिपान भुमरे यांचा दारूचा व्यवसाय आहे, तुम्हाला दारूवाला पाहिजे की सप्त्यावाला याचा विचार करा असे सांगून, शिवसेना कशा पद्धतीने फोडली आणि उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडलं असा प्रचार करत उद्धव ठाकरे यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही शिवसेना एकमेकांमध्ये भांडतील हिंदू मुस्लिम करतील. मात्र, मला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढायची असल्याचा सांगून इम्तियाज जलील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हिंदू मतांसाठी प्रयत्न केले.
इम्तियाज जलीलांना पुन्हा लागणार का लॉटरी?
इम्तियाज जलीलांचा विचार केला तर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही मुस्लीम समाजाची बहुतांश मतं जलीलांच्या पारड्यात जाऊ शकतील. मात्र, गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळी जलीलांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीची ताकद नाही. कारण, यावेळी वंचितने अफसर खान यांच्या रुपाने आपला स्वतंत्र उमेदवार दिला आहे. त्याचा फटका जलीलांना बसू शकतो. मात्र त्याचवेळी, हर्षवर्धन जाधव कुणाची मतं घेतात, किती प्रमाणात मतं कापतात, यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असेल. जलील यांनी आदर्श बँक घोटाळा प्रकरण चांगलेच उचलून धरले होते, आंदोलनही केले होते. याचा काही प्रमाणावर फायदा त्यांना होऊ शकतो. मात्र, अफसर खान यांना तितक्या प्रमाणात मतदान झाले नसल्याचे आकडेवारीतून समोर आले.
वाचा - 'जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर...', रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य
चंद्रकांत खैरेंना यावेळी भाजपाची साथ नाही, सहानुभूतीचा फायदा होईल का?
राज्यात शिवसेनेचे विभाजन झाले, एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. त्याच प्रमाणे स्थानिक पातळीवरही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे विभाजन झाले. यात बराच मोठा भाग एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडेही गेल्याचे दिसते आणि काही इतर पक्षात. कारण महायुतीकडे मतदार संघात 5 आमदार तर महाविकास आघाडीकडे 1 आमदार आहे. यामुळे चंद्रकांत खैरे यांना सर्कल आणि बुथ लेवलवर कार्यकर्त्यांची कमतरता भासू शकते. गेल्या वेळी ज्यांनी चंद्रकांत खैरे यांचा प्रचार केला, ते आता त्यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांचा प्रचार करताना दिसत आहेत. याचाही मोठा फटका खैरेंना बसू शकतो. मात्र, असे असले तरी, सध्या स्थानिक पातळीवर जनतेमध्ये उद्धव ठाकरेंसंदर्भात असलेल्या सहानुभूतीचा फायदाही खैरे यांना होऊ शकतो. याशिवाय, यावेळी खैरे भाजपविरोधात असल्याने काही प्रमाणावर अल्पसंख्यकांची मतेही खैरे यांना मिळू शकतात.
मोदींचा चेहरा संदिपान भुमरे यांच्या कामी येणार का?
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील युतीच्या आमदारांवर भुमरे यांची भिस्त आहे. भुमरे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच, विरोधकांनी त्यांच्यावर पहिला आरोप केला तो दारू व्यावसायिक असल्याचा. तेव्हापासून आतापर्यंत मतदारांमध्ये आणि सोशल मीडियावरही यासंदर्भात चर्चा होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे, उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानं जो वर्ग नाराज आहे, तोही विरोधात जाऊ शकतो. त्याचा कितपत फटका बसतो हे देखील महत्त्वाचे आहे. तर भाजपने उमेदवारीच्या अगोदर भुमरे यांना विरोध केला होता, त्यामुळे भाजपाने कितपत मनापासून भुमरे यांचे काम केले हे देखील गुलदस्त्यात आहे. भुमरे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यानंतर, त्यांनी जिल्हाभरात बरीच कामे केली आहेत. अगदी गुरांच्या गोठ्या पासून, शेतकऱ्यांना विहिरी मंजूर करून देईपर्यंत आणि अनेक गावांत रस्त्यांची आणि पेवरब्लॉकच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीही दिला आहे. याचा फायदाही त्यांना होऊ शकतो. याशिवाय भुमरे यांच्या पाठीशी शिवसेनेच्या तीन आणि भाजपच्या दोन आमदारांची ताकदही आहे.
वाचा - शिंदे 2019मध्येच मुख्यमंत्री झाले असते पण...; शरद पवारांच्या मुलाखतीनंतर राऊतांचा मोठा खुलासा
मराठा समाजाची भूमिका महत्त्वाची असेल
गेल्या काही दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा जबरदस्त गाजला. मराठा समाजातील बहुतांश लोकांच्या मनात भाजपाबद्दल काहीसा रोष आहे. अशा स्थितीत महायुतीने मराठा चेहराच मैदानात उतरवलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला चंद्रकांत खैरे आहेत. इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांचे कौतुकही केले होते. मात्र जलील यांनी छत्रपती संभाजीनगर नावाला केलेला विरोध मराठा समाजाला अजिबातच पटलेला नव्हता. गेल्या वेळी मराठा समाजाने हर्षवर्धन जाधव यांना मोठ्या प्रमाणावर मतदान केले होते. मात्र यावेळी त्यांच्यासोबत मराठा समाज फारसा दिसत नाही. यामुळे आता मराठा समाज कुणाच्या बाजूने मतदान करणार का यावर बरेच काही अवलंबून आहे. मात्र सध्या तरी मराठा समाज विभागलेला दिसत आहे. मराठा समाजाचा काही भाग युतीकडे, तर मोठा भाग महाविकास आघाडीकडे जाऊ शकतो, असे चित्र आहे.
निशाणीमुळे मतदारांमध्ये संभ्रम
अद्यापही धनुष्यबाण कुणाचा आणि मशाल कुणाची? हा निशाणीचा घोळ, कन्फ्युजन संपलेले दिसत नाही. मतदारांमध्ये विशेष करून महिला वर्गात निशाणीचा घोळ अजूनही कायम आहे. अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मशाल चिन्ह शेवटच्या व्यक्तीपर्यंत अथवा घराघरात पोहोचलेले दिसत नाही. याचा मोठा फटका चंद्रकांत खैरे यांना बसू शकतो. तर भुमरे यांना याचा फायदा मिळू शकतो. इतकी अटीतटीची लढाई असूनही, यंदा प्रचार काहीसा थंडच वाटला. त्यामुळे आता मतदानाच्या दिवशी मतदारांना घराबाहेर काढण्यात कोण यशस्वी ठरणार, मतदानाचा टक्का वाढणार की कमी होणार, यावर ४ तारखेचा निकाल अवलंबून असेल.
