वैजापुर तालुक्यामधील खंडाळा येथील रमाईनगर भागात पायल सुधाकर गोतीस या वीस वर्षीय युवतीने आत्महत्या केली. ही घटना 8 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. पायलने घरात ओढणीने गळफास घेतला. त्या दिवशी सकाळी पायलचे वडील सुधाकर गोतीस आणि आई कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरला गेले होते. दुपारी चारच्या सुमारास ते तपोवन एक्स्प्रेसने घरी परतले. त्यांनी पायलला आवाज दिला. पाणी मागितले. बराच वेळ झाला तरी प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बाजूच्या खोलीत पाहिले. खिडकीतून डोकावले असता पायल छताला लटकलेली दिसली. नातेवाईकांच्या मदतीने तिला खाली उतरवून वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन नलवडे आणि बिट जमादार विशाल पडळकर करत आहेत. पायलने आत्महत्येच्या अर्धा तास आधी आई-वडिलांशी फोनवर बोलले होते. आई-बाबा, तुम्हाला किती वेळ लागेल?असे विचारले होते. वडिलांनी आम्ही लासूर स्टेशनजवळ आहोत, अर्ध्या तासात पोहोचतो, असे सांगितले.
advertisement
पायल वैजापूर येथील कदम स्कूल ऑफ जेएनएम नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत होती. ती घरात नेहमी आनंदी असायची. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत्यूपूर्वी पायलने घरात आलेल्या विजेच्या मीटर बसवणाऱ्या कामगारांना स्वतःच्या हाताने चहा दिला होता. त्यानंतर गॅस सिलिंडरही घेतला होता. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री 9.30 वाजता खंडाळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पायलच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा आणि तीन बहिणी असा परिवार आहे.