प्राथमिक माहितीनुसार, तुळजापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवलेले उमेदवार पिंटू गंगेने आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात वाद झाला. हा वाद गोलाई चौकातील पंचायत समिती कार्यालयाजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून झाल्याचे समजते. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही वेळातच त्याचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले.
advertisement
रस्त्यावरच जोरदार धक्काबुक्की आणि मारहाण
या वादात दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. पाहता पाहता परिस्थिती चिघळली आणि रस्त्यावरच जोरदार धक्काबुक्की आणि मारहाण सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि बघ्यांची गर्दी जमली. या गोंधळामुळे धाराशिव आणि सोलापूरकडे जाणारा मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
रस्त्यावरील वाहतूक ठप्प
जवळपास दोन तासांहून अधिक काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवासी, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांना मोठा त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि जमाव पांगवला.
येत्या काळात तणाव वाढण्याची भीती
विशेष म्हणजे, निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच दोन गटांत असा हिंसक संघर्ष झाल्याने शहरात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. येत्या काळात हा तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, एवढा मोठा प्रकार घडूनही दोन्ही गटांकडून अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. दरम्यान, पोलिस प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, शहरात शांतता राखण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
